उत्पन्नाची हमी असलेली उदगीर-मरसांगवी बससेवा बंद pudhari photo
लातूर

Udgir Marsangvi Bus Service : उत्पन्नाची हमी असलेली उदगीर-मरसांगवी बससेवा बंद

जळकोट : प्रवाशांतून नाराजी; आंदोलन करण्याचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

जळकोट : डोंगर कपारीतील व दुर्गम भागातील मरसांगवी (ता. जळकोट) परिसरातील गावे व तांडे आदी ठिकाणच्या नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त असलेली व राज्य परिवहन महामंडळास हमखास उत्पन्न मिळवून देणारी उदगीर - मरसांगवी ही मुक्कामी बससेवा अचानकपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे गैरसोयीला तोंड द्यावे लागत असून एस. टी. चे उत्पन्नही बुडत आहे. ही बस सेवा तात्काळ सुरू करावी अन्यथा रास्ता प्रवाशांना रोको आंदोलन करू असा इशारा डोंगरगाव, मरसांगवी, सुल्लाळी व परिसरातील वाडी, तांडे येथील नागरिक व विद्यार्थ्यांनी दिला आहे.

स्वातंत्र्य काळापासून आजतागायत मरसांगवी व परिसर बससेवेपासून वंचित असून या भागातील नागरिकांना तालुका व जिल्हा मुख्यालयी जा ये करण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. तसेच पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे उदगीर मरसांगवी जळकोट अशी बस सेवा उदगीर आगारातून सुरू करावी अशी मागणी करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन उदगीर आगारातून उदगीर -मरसांगवी ही बस सेवा चालू पण करण्यात आली होती. या बसगाडीला प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळत असताना ती काही महिन्यांपासून ती बंद करण्यात आली आहे.

मरसांगवी हे गाव जळकोट तालुक्यातील प्रमुख गावांपैकी एक आहे. हे गाव तिरू नदीच्या काठावर असून लोकसंख्याही मोठी आहे. येथील विद्यार्थी माध्यमिक, महाविद्यालयीन, व्यावसायिक व तांत्रिक शिक्षणासाठी जळकोट, उदगीर, अहमदपूर आदी ठिकाणी दररोज जा ये करतात. परंतु, बस सेवा बंद झाल्याने गोरगरिब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खोळंबा होत आहे.

तालुका व जिल्हा मुख्यालयास जा ये करण्यासाठी आबालवृद्ध प्रवाशांना बरेच अंतर पायपीट करून बसगाडी पकडावी लागते. रुग्ण, प्रसूतीसाठी जाणाऱ्या महिला आर्दीचे हाल होत आहेत. गाव नदीकाठी असल्याने नैसर्गिक संकटांना सतत तोंड देत आहे. त्यामुळे सदर बस सेवा तातडीने सुरू करावी अशी मागणी मरसांगवी ग्रामपंचायतीच्या सरपंच रवी पूजा गोरखे यांनी केली आहे.

अन्यथा रास्ता रोको

उदगीर - मरसांगवी ही बससेवा या भागातील प्रवासी व विद्यार्थी यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. अपेक्षित उत्पन्न मिळत असतानाही बससेवा अचानक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होत असून सर्वच घटकांना त्रास सोसावा लागत आहे. त्यामुळे ही बस सेवा तातडीने सुरू करावी अन्यथा उदगीर -जळकोट - नांदेड राष्ट्रीय महामार्गावर त्रस्त नागरिकांकडून तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते रवी गोरखे यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT