लातूर : चाकूर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यातील तिघा आरोपींना अतिरिक्त सत्र न्यायालय क्रमांक एक, लातूर यांनी दोषी ठरवत प्रत्येकी तीन वर्षे सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने भारतीय दंड विधानाच्या कलम ३२६ सह कलम ३४ अन्वये ही शिक्षा सुनावली असून, कलम ३२३ सह कलम ३४ अन्वयेही प्रत्येकी सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
मेथी, ता. अहमदपूर येथील अरुण केशवराव जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून चाकूर पोलीस ठाण्यात २०१७ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक संतोष गित्ते यांनी केला.
तपास पूर्ण करून आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर हे प्रकरण अतिरिक्त सत्र न्यायालय क्रमांक एक, लातूर येथे सत्र खटला क्रमांक ४७/२०१८ म्हणून चालविण्यात आले.
खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायालय क्रमांक एकचे न्यायमूर्ती भोसले यांनी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी निकाल दिला. वेंकट अच्युत जाधव, सागरबाई अच्युत जाधव आणि अच्युत केशवराव जाधव, तिघेही रा. मेथी, ता. अहमदपूर, यांना दोषी ठरविण्यात आले.
कलम ३२६ सह ३४ अन्वये प्रत्येकी तीन वर्षे सश्रम कारावास व अडीच हजार रुपये दंड, तर कलम ३२३ सह ३४ अन्वये प्रत्येकी सहा महिने सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली.
शासन पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता संजयकुमार मुंदडा यांनी प्रभावी बाजू मांडली. खटल्याच्या यशस्वी पैरवीसाठी पोलीस अमलदार चंद्रकांत गंगाधर राचमाळे आणि प्रमोद तरडे यांनी विशेष परिश्रम घेतले.