Latur News : आपत्कालीन हेल्पलाइनचा गैरवापर : ११२ वर 'टाईमपास' कॉल; उदगीरमधील प्रकार file photo
लातूर

Latur News : आपत्कालीन हेल्पलाइनचा गैरवापर : ११२ वर 'टाईमपास' कॉल; उदगीरमधील प्रकार

प्रतिष्ठितांकडूनही गैरवापर; आपत्कालीन सेवेला धोका

पुढारी वृत्तसेवा

Abuse of emergency helplines: 'Timepass' calls to 112; Types in Udgir

जावेद शेख

उदगीर : नागरिकांच्या सुरक्षेसाठी सुरू करण्यात आलेल्या ११२ आपत्कालीन हेल्पलाइनचा उदगीर शहर व ग्रामीण भागात गैरवापर होत असल्याचे समोर आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून ११२ वर खोटे अथवा चुकीची माहिती देणारे कॉल मोठ्या प्रमाणात येत असून, यामध्ये वकील, प्राध्यापक, डॉक्टर आणि व्यावसायिकांसारख्या प्रतिष्ठित व्यक्तींचाही समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कॉल मिळाल्यानंतर पोलीस पथक तातडीने घटनास्थळी पोहोचते; मात्र अनेकदा तेथे कोणतीही घटना घडलेली नसल्याचे आढळून येते.

पोलिसांच्या माहितीनुसार, काही जण भांडण सुरू असल्याचे, संशयित व्यक्ती फिरत असल्याचे किंवा अपघात झाल्याचे सांगून ११२ वर फोन करतात. माहिती मिळताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेतात. चौकशी केल्यानंतर माहिती खोटी असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे पोलीस कर्मचारी, वाहन आणि इंधनाचा विनाकारण वापर होतो. एका कॉलसाठी दोन ते तीन कर्मचारी आणि वाहन २० ते ३० मिनिटे गुंतून राहते.

त्याचवेळी अन्य ठिकाणी खरी आपत्कालीन घटना घडल्यास मदत पोहोचण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. समाजात जबाबदार भूमिका असलेल्या व्यक्तींकडूनच हेल्पलाइनचा गैरवापर होत असल्याने पोलिसांनी चिंता व्यक्त केली आहे. काही महाविद्यालयांतील प्राध्यापक, खासगी रुग्णालयांतील डॉक्टर तसेच व्यावसायिकांकडून चुकीचे कॉल आल्याच्या नोंदी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, उदगीर शहरातील एका वकीली व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीने मद्यप्राशन करून सिगारेट न दिल्याच्या कारणावरून ११२ वर कॉल केल्याची घटना घडली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांशी अरेरावी केल्याने संबंधित व्यक्तीवर मद्यप्राशन करून वाहन चालविल्याबद्दल मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाई केली जाणार

११२ हा क्रमांक जीवाला धोका, अपघात, महिला सुरक्षेचा प्रश्न किंवा गुन्हा घडल्यास तातडीने मदत मिळविण्यासाठी आहे. या क्रमांकाचा वारंवार गैरवापर करणाऱ्यांची यादी तयार करण्यात येत असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

११२ वर केवळ खरी आपत्कालीन परिस्थिती असतानाच कॉल करावा. करमणूक, चौकशी किंवा विनाकारण कॉल करून पोलिसांचा वेळ व संसाधने वाया घालवू नयेत. खोटी माहिती देणे म्हणजे गरजू व्यक्तीला वेळेवर मदत मिळण्यास अडथळा निर्माण करण्यासारखे आहे. नागरिकांनी आपत्कालीन हेल्पलाइनचा जबाबदारीने वापर करावा.
- दिलीप गाडे, पोलीस निरीक्षक, उदगीर ग्रामीण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT