

लातूर : राहुल गांधी यांच्या वंदे मातरमविषयीच्या भूमिकेवरून सुरू झालेला राजकीय वाद आता लातूरपर्यंत पोहोचला आहे. राहुल गांधी यांच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी लातूर शहरातील काँग्रेस भवनसमोर रविवारी सायंकाळी आंदोलन करण्याचा निर्धार केला. मात्र पोलिसांनी त्यांना गांधी चौकानजीक अडवले भाजपच्या आंदोलनाला विरोध करण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने काँग्रेस भवनसमोर एकत्र आले. दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने जिल्हाध्यक्ष ऋषिकेश रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वात आंदोलनासाठी काँग्रेस भवनकडे जाणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखून धरल्याने गांधी चौकातच त्यांना आंदोलन करावे लागले. यावेळी त्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम, सोनिया गांधी हाय हाय, राहुल गांधी हाय हाय अशा घोषणा दिल्या. काँग्रेसचे आंदोलन जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली झाले.
यावळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही भाजपचा निषेध करीत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. भाजपच्या अरेरावीला आपण घाबरणार नाही असे सुनावले. आंदोलनादरम्यान भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी लातूर पोलिसांनी दोन्ही गटांच्या मध्ये मोठी पोलीस फळी तैनात केली. भाजप कार्यकर्ते आंदोलनावर ठाम होते, तर काँग्रेस भवनसमोरून हटण्यास काँग्रेसचे कार्यकर्तेतयारर नसल्याने पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. दरम्यान, या आंदोलनामुळे लातूर शहरातील प्रमुख मार्गांवरील वाहतुकीवर परिणाम झाला. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना अतिरिक्त बंदोबस्तासह प्रयत्न करावे लागले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांकडून दोन्ही गटांना शांततेचे आवाहन करण्यात आले.