31 villages, 10 wadis-Tandya in Ahmedpur taluka face water shortage
अहमदपूर, पुढारी वृत्तसेवा : सिंचनाचा तालुका म्हणून ओळख असणाऱ्या अहमदपूर तालुक्यात यंदा सरासरी पर्जन्यमानाच्या दीडपट पाऊस होऊनही उन्हाची तीव्रता अधिक असल्यामुळे, झपाट्याने बाष्पीभवन होऊन पाणी पातळी खालावली आहे.
याचा परिणाम सद्यस्थितीत तालुक्यातील ३१ गावे, ६ वाड्या आणि तांड्याना भीषण पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. प्रशासनाने या गावात विहीर / बोअरचे अधिग्रहण करून पाण्याची व्यवस्था केली आहे. अशी माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पंकज शेळके यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती अशी की, अहमदपूर तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र हे खडकाळ, मुरुमी व हलक्या जमिनीचे असून या भागात प्रत्येक वर्षी पाणीटंचाई जाणवत असते. यंदा तर सरासरीपेक्षा दीडपट पाऊस होऊनही पाणीटंचाई भासत आहे. तालुक्यात ९७ ग्रामपंचायती व १२४ गावांचा समावेश आहे. यापैकी ३१ गावे, ६ वाड्या आणि ४ तांड्यातून पाणीटंचाईचे ५२ प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल झाले असून पंचायत समितीने क्षेत्रीय अधिकारी यांची पाहणी करून जवळपास ३१ प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी तहसीलच्या पाणीटंचाई विभागाकडे पाठवले.
त्यापैकी तहसील कार्यालयाने २५ प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. या टंचाईग्रस्त गावांना सध्या विहीर / बोअरचे अधिगृहण करून पाणीपुरवठा चालू आहे. परंतु उर्वरित १६ गावातील अधिगृहणाचे प्रस्ताव अद्यापही मंजुरीच्या प्रतीक्षेत असून या गावांना लवकरात लवकर पाण्याची व्यवस्था करणे अत्यावश्यक आहे.
सद्यस्थितीत खालील गावांना अद्यापही पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत असून यात प्रामुख्याने अंधोरी, गंगा हिप्परगा, उजना, उमरगा कोर्ट, किनगाव, परचंडा, उमरगा यल्लादेवी, मोळवण, खंडाळी, मानखेड, खानापूर, गुंजोटी, लेंडेगाव, चोवळी, कुमठा, वळसंगी या गावांचा समावेश आहे. तर सलगरा, व्होटाळा, थावरा तांडा, खरकाडी तांडा, नांदुरा बु., विजयनगर तांडा, धसवाडी, विळेगाव, काळेगाव, कुमठा, जवळगा, उन्नी जांब, शेनी, खंडाळी, धसवाडी, मांडणी, टाकळगाव, परचंडा, कोपनरवाडी, अजनी, बेलूर, बेंबडेवाडी, वळसंगी, गुट्टेवाडी, या गावातील पाणीटंचाईच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली असून येथे विहीर / बोअरचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा होत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.