Will march towards Mumbai after Antarwali Sarati
जालना : पुढारी वृत्तसेवा मराठा समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथे आंदोलन होणारच असून त्यानंतर मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी व्यक्त केला.
अंतरवाली सराटी येथे बुधवारी ते माध्यमांशी बोलत होते. मुंबईला जाण्यासाठी आम्ही परवानगीचा अर्ज दिला आहे. परवानगी द्या अथवा देऊ नका, मुंबईत जाण्याचा आमचा निर्णय ठरलेला आहे. सरकारने मुंबईत जाणाऱ्या मराठा समाजाला अडवण्याचा प्रयत्न करू नये. सरकारकडे सत्ता आणि कायदा आहे; मात्र त्याचा गैरवापर करू नये. मराठा समाजाने निवडून दिलेले नेतेच आता मराठ्यांना मुंबईत येऊ नका, असे सांगत असल्याने समाजामध्ये रोष वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला.
मुंबईतील नागरिकांना आंदोलनामुळे काही दिवस त्रास होऊ शकतो. मात्र, मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मुंबईकरांनी सहकार्य करावे, असे आवाहनही जरांगे यांनी केले. मुंबईत कोणताही समाज पूर्णपणे सुखी नसल्याचे सांगत सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठीही हे आंदोलन असल्याचे त्यांनी सांगितले.
'वर्षा' बंगला, शिवाजी पार्कला जाणार
आझाद मैदानासह दादर, शिवाजी पार्क, 'वर्षा' बंगला परिसर तसेच अन्य ठिकाणी आंदोलन करण्याची भूमिका त्यांनी मांडली. आंदोलन रोखण्यासाठी पोलिसांचा वापर करू नये, असा इशाराही त्यांनी दिला. २९ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीत आंदोलन आणि त्यानंतर मुंबई आंदोलनासाठी सज्ज राहावे, असे आवाहन त्यांनी समर्थकांना केले. 'मुंबईला गेल्यानंतर जिंकूनच माघारी यायचे,' असा निर्धारही जरांगे यांनी यावेळी व्यक्त केला.