Water scarcity in Gadegavhan village for the past month
टेंभुर्णी, पुढारी वृत्तसेवा : जाफराबाद तालुक्यातील गाडेगव्हाण येथील जल जीवन मिशन योजनेचा पुरता बोजवारा उडाला आहे. गावात गेल्या एक महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, योजनेवर लाखो रुपये खर्च होऊनही ग्रामस्थ पाण्यासाठी वणवण भटकती करावी लागत आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
गाडेगव्हाण येथे जल जीवन मिशन अंतर्गत विहिरीच्या शेजारीच धरणाचे पाणी असूनही नियोजनाअभावी विहिरीला पाणी उतरत नाही. तरीही विहिरीमध्ये ५० ते ७० फुटांपर्यंत आडवे बोअर घेण्यात आले. आश्चर्याची बाब म्हणजे, या बोअरचा गावाला थेंबभरही फायदा झालेला नाही, मात्र या कामाची बिले लाटण्यात आल्याची चर्चा गावात सुरू आहे. लाखो रूपये खर्च होऊन गावाला मिळत नसल्याने योजना फेल ठरली आहे.
उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना गाडेगव्हाण ग्रामस्थांना गेल्या एक महिन्यापासून पिण्याचे पाणी मिळालेले नाही. हंडाभर पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत आहे. गावातील या पाणी प्रश्नाबाबत ग्रामसेवक आणि सरपंचांना वारंवार अवगत करूनही त्यांनी याकडे गांभीयनि पाहिलेले नाही. प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या या आडमुठ्या धोरणामुळे सर्वसामान्य जनता मात्र पाण्यासाठी तडफडत आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
लाखो रूपर्य खर्च करुन पाणी मिळेना
हर घर जल या संकल्पनेला प्रशासकीय अनास्थेचा ग्रहण लागला आहे. जल जीवन मिशन अंतर्गत लाखो रुपये खर्च झाल्याचे कागदावर दिसत असले, तरी प्रत्यक्षात गावाला गेल्या एक महिन्यापासून पिण्याचे पाणी मिळालेले नाही. या गंभीर परिस्थितीला ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि सरपंच पूर्णपणे जबाबदार असल्याचा खळबळजनक आरोप माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विलासराव शेषराव बनकर यांनी केला आहे.
एका पाईपची गरज
गावाच्या पाणीपुरवठा विहिरीमध्ये पाणी उपलब्ध आहे. परंतु विहिरीतील मोटर खाली सोडण्यासाठी केवळ १० ते १५ फूट पाईपची आवश्यकता आहे. इतक्या शुल्लक कामासाठी आणि किरकोळ खर्चासाठी या योजनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. एका पाईपअभावी गावाला पाणी मिळेना