Water released from Jayakwadi into Godavari basin
शहागड, पुढारी वृत्तसेवा: अबंड तालुक्यात पडलेल्या पावसामुळे शहागड-वाळकेश्वर कोल्हापुरी तसेच पाथरवाला निम्न पातळीचा बंधारा भरलेला असल्याने गोदावरी नदीपात्र दुथडी भरून वाहात आहे. त्यातच नाशिक क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने गंगापूर धरण भरून पुराचे पाणी जायकवाडी जलाशयात झेपावल्याने जायकवाडी धरणात ९० टक्क्यांवर पाणीसाठा गेल्याने गोदावरी नदीपात्रात गुरुवारी पाणी सोडण्यात आले. हे पाणी शुक्रवारी दुपारपर्यंत शहागडपर्यंत पोहचले नसले तरी अंबड तालुक्यातील सोळा गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पावसाळी तडाख्यामुळे जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली होती. नाथसागर जलाशयात ९०.१४ % वर जलसाठा नोंदवला गेल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून गोदावरी नदीपात्रात ९ हजार ४३२ क्युसेक पाणी झेपावले आहे. यामुळे अंबड तालुक्यातील बळेगाव, आपेगाव, साष्टपिंपळगाव, डोमलगाव, गोरी गंधारी, शहागड, वाळकेश्वर, कुरण पाथरवाला, गोंदी, हसणापूर-कोठाळासह गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन, सावळेश्वर, खामगाव, नागझरी, आगरनांदर, हिंगणगाव, कटचिचॉली, पंचाळेश्वर, लहान गोंदी, सोळा गावांना पुराचा धोका बसण्याची शक्यता आहे.
गोदावरी नदीला येणाऱ्या संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हाधिकाऱ्यांनी अंबड, परतूर, मंठा, घनसावंगी व तीर्थपुरी परिसरातील नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत गोदावरी नदीपात्रात प्रवेश करू नये, नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी चल-मालमत्ता, जनावरे, वाहने व शेती अवजारे सुरक्षित स्थळी हलवावीत, दवंडी व स्थानिक प्रसारमाध्यमांद्वारे इशारे देण्यात यावेत, पुरामुळे कोणतीही जीवित वा वित्त हानी होणार नाही यासाठी खबरदारी घ्यावी, स्थानिक यंत्रणांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने अंमलात आणाव्यात, असे स्पष्ट निर्देश आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालनाचे गणेश महाडीक यांनी दिले आहेत.
गोदावरी नदीत जायकवाडीतून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पूर येण्याची शक्यता आहे. त्यासाठी शहागड ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर याबाबत नोटीस चिटकविण्यात आली असून गावातही दवंडी देण्यात आली असल्याची माहिती ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दिली आहे.