Vacant posts of teachers in ZP school
तळणी, पुढारी वृत्तसेवा मंठा तालुक्यातील वाघाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गेल्या दोन वर्षांपासून नियमित शिक्षक नाहीत, परिणामी शाळेतील ५३ विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. गावकऱ्यांनी अनेक वेळा मागणी करूनही शिक्षक उपलब्ध न झाल्याने शिक्षण विभागाच्या कामकाजाविषयी ग्रामस्थांत नाराजी आहे. या शाळेत तीन शिक्षकांचे पदे मंजूर असून त्यापैकी दोन पदे रिक्त आहे.
आदिवासीबहुल व अत्यंत हलकीच्या आर्थिक परिस्थितीतील या गावातील पालकांना मुलांना बाहेर शिक्षणासाठी पाठविणे शक्य नसल्याने विद्याथ्यर्थ्यांचे शिक्षण थांबण्याच्या मार्गावर आहे. जिल्हा परिषद शाळा चौथीपर्यंत आहे. या ठिकाणी तीन शिक्षकांचे पदे मंजूर आहे. या पैकी मुख्याध्यापकाचे पद भरलेले आहे. परंतु मुख्याध्यापक यांची ड्युटी तहसील कार्यालयात निवडणूक विभागात लागलेली आहे. त्यांना शाळेवर तीन दिवस जाण्यास सांगितलेले आहे. परंतु ते येत नसल्याचा आरोपन ग्रामस्थांतून होत आहे. १९ सप्टेंबरपासून प्रभारी म्हणून रुजू झालेले शिक्षक आपल्या सोईनास येत आहे. यामुळे शाळेत शिक्षक येत नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
पोषण आहाराची दुर्दशा
विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या खिचडीत भाजीपाला न घालता केवळ नावापुरता आहार देण्यात येत असल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे. खिचडी ही विद्यार्थ्यांना खाण्यायोग्य नसल्याने पोषण आहाराचा उद्देश पूर्णपणे फेल झाल्याचे चित्र आहे. तळणी परिसरातील अनेक शाळांमध्ये पोषण आहार व शिक्षकांच्या शाळेवर वेळेवर न येण्याची अनियमितता दिसून येते यावरही शिक्षण विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे
"विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जात आहे. शिक्षक नियुक्तीसाठी अनेक वेळा निविदने दिली शाळेतील गैरव्यवस्थेविरोधात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करावी.-सुनील कांगणे, सरपंच, वाघाळा
नुकतेच पालघर येथून काही शिक्षकांची बदली करण्यात आली आहे. त्यापैकी काही शिक्षक मंठा तालुक्यात कार्यरत होणार आहेत. त्यामुळे पुढील आठ ते दहा दिवसांत वाघाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल. विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होऊ नये यासाठी प्रशासन गंभीर असून लवकरात लवकर शिक्षक नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल."गोविंद चव्हाण, गटशिक्षणाधिकारी मंठा
"गेल्या दोन वर्षांपासून आम्ही गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रारी देत आहोत. परंतु अजूनपर्यंत जिल्हा परिषद प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही. या निष्काळजीपणामुळे लहान मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे." वरिष्ठांनी दखल घ्यावी.-महादेव कांबळे, माजी शिक्षण समिती अध्यक्ष