जालना : परतूर तालुक्यातील उस्मानपूर येथे जुन्या वादाच्या कारणावरून भाऊबंदकीत तुफान राडा झाल्याची खळबळजनक घटना सोमवारी (दि. १४) रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली.
फिर्यादी चंदकला उझंबरे आणि त्यांच्या सासू गंगाबाई उझंबरे या घरी असताना, भावकीतील गोपाळ उझंबरे हा त्यांच्या घरासमोर आला. "तुझा मुलगा राम कुठे आहे?" असे विचारत त्याने चंदकला यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
चंदकला यांनी 'मला माहिती नाही' असे सांगताच गोपाळचा मुलगा किसन गोपाळ उझंबरे हादेखील तिथे धावून आला. या दोघांनी चंदकला यांना चापटबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. चालू असलेली मारहाण सोडवण्यासाठी वृद्ध सासू गंगाबाई उझंबरे मध्ये आल्या असता, आरोपी किसन याने हातातील काठीने त्यांच्या उजव्या खांद्यावर जोरदार प्रहार केला.
याच दरम्यान मुलगा राम घरी आला असता त्यालाही आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी चंदकला उझंबरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून परतूर पोलिस ठाण्यात आरोपी गोपाळ बिरे (उझंबरे), किसन गोपाळ बिरे (उझंबरे), महानंदा गोपाळ बिरे (उझंबरे) आणि पूजा किसन बिरे (उझंबरे) (सर्व रा. उस्मानपूर, ता. परतूर) या चौघांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सुदाम भाऊसाहेब भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलिस हवालदार अशोक लिंबाजी गाढवे करत आहेत.