Two die due to electrocution in Ghansawangi taluka
जालना, पुढारी वृत्तसेवा : घनसावंगी व तालुक्यातील वडीरामसगाव व मुरमा (कंडारी शिवार) येथे वीजप्रवाहामुळे दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनांची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (सामाजिक न्याय विभाग) अंबड तालुकाध्यक्ष प्रवीण भिंगारदेव यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनानुसार, वडीरामसगाव येथील विष्णू निवृत्ती लहामगे तसेच मुरमा (कंडारी शिवार) येथील ज्ञानेश्वर भिमराव गिरी यांचा वीजप्रवाहामुळे मृत्यू झाला. या घटनांमुळे महावितरणच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, दोन्ही प्रकरणांची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासोबतच संबंधित भागातील वीजवाहिन्यांची देखभाल, सुरक्षा तपासणी, तक्रारींची नोंद आणि त्यावर झालेल्या कार्यवाहीची सखोल पडताळणी करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सुरक्षा तपासणी मोहीम
भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी राज्यभर विशेष सुरक्षा तपासणी मोहीम राबवून धोकादायक वीजवाहिन्या, खांब आणि उपकरणांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, तसेच मृतांच्या कुटुंबीयांना तातडीची आर्थिक मदत व योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.