Traditional Watermelon Wadi History
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : तीन दशकांपूर्वी गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या गाळपेऱ्यावर कहार समाजातील नागरिक पारंपरिक पद्धतीने टरबूज, खरबूज, काकडी, खिरे, वालक, चवळीच्या शेंगा आदी पिकांची वाडी लावत असत. तीन दशकांत मोठ्या प्रमाणात झालेल्या वाळू उत्खननामुळे तसेच नदीवर उभारण्यात आलेल्या बंधारे-बरेजमुळे गाळपेरा पूर्णतः नष्ट झाला. त्यासोबतच गोदावरीकाठची पारंपरिक टरबूज वाडीही संपुष्टात आली आहे.
दिवाळीनंतर पैठणपासून परभणी, नांदेड जिल्ह्यापर्यंत नदीकाठावर फुलणारी गोड, रसाळ गावरान फळांची परंपरा आज इतिहासजमा झाली आहे. या बदलांमुळे कहार समाजातील नागरिक हवालदिल झाले असून आता त्यांना शेतकऱ्यांकडून बटाईने शेती घ्यावी लागत आहे.
खत, बियाणे, कीटकनाशके यांचा अर्धा-अर्धा खर्च उचलून तीन महिन्यांचे पीक घेतले जाते. वाडीची लागवड, निगा, तोडणी व बाजारपेठेत विक्री ही कौशल्याची कामे असून त्यासाठी प्रचंड कष्ट आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी लागत आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी कुटुंबासह शेतात झोपड्या करून वास्तव्यास राहण्याची वेळ या समाजावर आली आहे.
यावर्षी घनसावंगी तालुक्यात बीड जिल्ह्यासह अंबड, परतूर, माजलगाव, गेवराई तालुक्यांतून शेकडो कुटुंबे आली असून घनसावंगी, मच्छिंद्रनाथ चिंचोली, कुंभार पिंपळगाव, गुरू पिंपरी, देवनगर तांडा, तीर्थपुरी, रामसगाव, देवी दहेगाव, भेंडाळा, कोठाळा, जाम समर्थ, मासेगाव आदी गावांमध्ये शेकडो एकरांवर टरबूज वाडी लावण्यात आली आहे.
गोदावरीकाठची पारंपरिक वाडी संपली. आता बटाईने शेती घेऊनच उदरनिर्वाह करावा लागतो. ढगाळ वातावरण, गारपीट किंवा वादळी वाऱ्याने हाता-तोंडाशी आलेला घासही हिरावला जातो. देवनगर तांडा येथे पाच एकर वाडी लावली असून मिळकतीची आशा आहे."रामभाऊ कुंधारे, शेतकरी, लवूळ
गोदावरी नदीकाठची पारंपरिक टरबूज वाडी नष्ट होणे ही केवळ शेतीचीच नव्हे तर कहार समाजाच्या उपजीविकेची मोठी हानी आहे. वाळू उत्खनन आणि बंधारे बॅरेजमुळे गाळपेरा संपुष्टात आला असून पिढ्यान्पिढ्या चालत आलेला व्यवसाय आज संकटात सापडला आहे. शासनाने या समाजाच्या पारंपरिक कौशल्याला संरक्षण देत आर्थिक मदत, पीकविमा आणि स्थैर्य देणाऱ्या योजना राबवाव्यात, अशी अपेक्षा आहे.-हरिदास धुंगासे, गुंज बुद्रुक