पिंपळगाव रेणुकाई : पावसाने पाठ फिरवल्यामुळे सुकण्याच्या मार्गावर असलेल्या मिरचीच्या पिकाला अखेर समाधानकारक पावसाने जीवदान दिले आहे. सलग पडलेल्या पावसामुळे पिकांना नवीन पालवी फुटली असल्याने शेतशिवार हिरवेगार दिसून लागले आहे.
भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाईसह परिसरात मिरची उत्पादक शेतकऱ्यांना निसर्गाने मोठा दिलासा दिला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून तालुक्यात काही भागांत झालेल्या कमी-अधिक पावसामुळे करपणाऱ्या मिरची पिकाला तूर्तास जीवदान मिळाले आहे. मात्र, हा पाऊस येण्यापूर्वी पाण्यासाठी झालेली जीवघेणी कसरत आणि आर्थिक कोंडीमुळे अनेक शेतकऱ्यांना आपली उभी पिके उपटून फेकण्याची वेळ आली. हे या भागातील शेतीचे भीषण वास्तव आहे.
भोकरदन तालुक्यातील विहिरींनी तळ गाठला असून पाणी पातळीही झपाट्याने घटत आहे. परिणामी शिवारातील बहरलेली मिरचीची पिके डोळ्यादेखत सुकू लागली आहेत. हातचे पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना दानापूर व सुरंगळी या ठिकाणाहून दहा किलोमीटर अंतरावरून विकत पाणी आणावे लागत आहे.
६ हजार रुपये प्रतिट्रॅकर दराने पाणी विकत घेऊन ते विहिरीत टाकून पिकांना पाणी द्यावे लागले आहे. हा केविलवाणा खटाटोप तळपत्या उन्हात सुरू होता. परंतु तीन दिवसांपासून पाऊस झाल्याने तालुक्यातील ७ हजार हेक्टरवर मान्सूनपूर्व उन्हाळी मिरची पीक वाचले आहे.
आन्वा, वाकडी, कुकडी, जानेफळ गायकवाड, पारध, वालसावंगी, धावडा, हिसोडा, कोठा कोळी, करजगाव, कल्याणी, आडगाव भोंबे, दहिगाव, धोंडखेडा, कोदा, जळगाव सपकाळ, सुरंगळी, कठोरा बाजार, दानापूर या गावांचा यात समावेश आहे. एप्रिलच्या अखेरीस व मेच्या सुरुवातीस लागवड पूर्ण झाली होती. सुरुवातीला विहिरींच्या पाण्यावर उभे राहिलेले पीक आहे.
काही भागांत रोगराई व बदलत्या हवामानामुळे उत्पादनातही घट झाली आहे. एकीकडे उत्पादन कमी तर दुसरीकडे बाजारभाव घसरल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी मिरची पिकावर मोठ्या आशा ठेवून कर्ज काढले आहे. पाऊस झाल्यामुळे मिरची पिकाला जीवदान मिळाले.वैभव देशमुख मिरची उत्पादक शेतकरी