The yield of country mangoes is low this year.
आन्वा, पुढारी वृत्तसेवा : यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटाका भोकरदन तालुक्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून चालू वर्षी गावरान आंवा चांगलाच रुसणार आहे. यामुळे गावरान आंब्याची चव म्हणावी तितकी चाखायला मिळणार नाही, असे तालुक्यातील सध्याचे चित्र आहे.
चालू वर्षी आंबा उत्पादनावर नैसर्गिक लहरीपणाचा मोठा चांगलाच परिणाम झालेला दिसून येत आहे. ज्यावेळी आंब्याच्या झाडांचा मोहर बहरण्याची (येण्याची) स्टेज होती. त्यावेळी अचानकच्या पडलेल्या पावसामुळे आंब्याचा मोहर बहरण्याऐ-वजी आंब्याच्या झाडाचीच ग्रोथ (पालवी) वाढली आहे. त्यामुळे अपेक्षित प्रमाणात मोहोर (फुलोरा) न आल्याने आंबा उत्पादनात मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे.
शेतकऱ्यांच्या मते, यंदा हवामानातील अनियमितता, पावसाचा लांबलेला कालावधी आणि तापमानातील चढ-उतार यामुळे आंब्या झाडाला आवश्यक असलेली थंडीच यावर्षी मिळाली नाही. त्यातच बरोबर आक्टोंबर, नोव्हेंबर महिन्यात पडलेल्या पावसामुळे मोहर वाढण्या ऐवजी झाडाची वाढच वाढली परिणामी त्यांचा परिणाम आंब्याला मोहर येण्यावर झाला. परिणामी, आंब्याच्या झाडांना मोहोर येण्याचे प्रमाण अगदी कमी झाले आहे.
गेल्या वर्षीप्रमाणेच उत्पादन होईल असा शेतकऱ्यांचा विश्वास होता. परंतु प्रत्यक्षात मोहोर ३० ते ४० टक्क्यांनी कमी आला आहे. त्यामुळे गावरान आंब्यासह केसर, देवगड, हापूस, पायरी, राघू, साखर गोठी, रोपडी, तोतापुरीसह इतर आंब्याच्या जातींमध्येही उत्पादन घटण्याची शक्यता आंबा उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. याचा थेट परिणाम बाजारातील आंब्याच्या किंमतीवर होण्याची शक्यता आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्यास ग्राहकांना यंदा आंबा महाग मिळू शकतो.
उत्पादनावर फटका
गतवर्षी पाऊसच लांबल्याने व ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात पडलेल्या पावसामुळे मोहर वाढण्याऐवजी झाडांची वाढच झाली त्याच फटका आंबा उत्पादनावर झाला आहे