The sweet result of tamarind cultivation
पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरात अनेक शेतकऱ्यांनी वर्षानुवर्षे चिंचेची लागवड केलेली आहे. या लागवडीमुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत असून व्यापारी व मजुरांनाही मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे.
परिसरातील शेतकरी शेतातून चिंचा तोडून आणतात. त्यानंतर घरी त्यांची प्रक्रिया करून चिंचोके वेगळे केले जातात. सध्या बाजारपेठेत चिंचेला प्रति क्विंटल सुमारे १२ ते १३ हजार रुपये इतका भाव मिळत आहे. तर व्यापारी शेतकऱ्यांकडून उभ्या झाडांवरची चिंच साधारण दोन ते अडीच हजार रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करतात.
व्यापारी चिंच गोळा करून त्यावर प्रक्रिया करतात आणि व्यापार पेठेत विक्रीसाठी पाठवतात. त्यामुळे या भागात चिंच व्यापाराची चांगली साखळी तयार झाली आहे. विशेष म्हणजे चिंचेच्या झाडांना फारशी फवारणी किंवा औषधांची गरज नसते. त्यामुळे उत्पादन खर्च कमी असून शेतकऱ्यांना जवळपास शंभर टक्के उत्पन्न मिळते. यामुळे परिसरातील अनेक शेतकरी चिंचेच्या झाडांची लागवड करण्याकडे वळत असून दरवर्षी त्यांच्या उत्पन्नात भर पडत आहे.
परराज्यात चिंच विक्रीसाठी आम्ही पिंपळगाव रेणुकाई परिसरासह आजूबाजूच्या गावांमधून शेतकऱ्यांकडून चिंच खरेदी करतो. त्यावर प्रक्रिया करून ती परराज्यात विक्रीसाठी पाठवतो. त्यामुळे आम्हाला आणि अनेक मजुरांना रोजगार मिळतो. याचा शेतकऱ्यांनाही चांगला फायदा होत आहे. त्यांचे उत्पन्न वाढत आहे.- समीर पठाण, व्यापारी