The first mayor will be decided on February 9th
जालना, पुढारी वृत्तसेवा: जालना महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर होताच शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. आतापर्यंत विविध समीकरणांवर आधारित असलेले महापौर पदाचे गणित आता पूर्णतः बदलले असून, महिला नेतृत्व केंद्रस्थानी आले आहे. महापौर पदाच्या शर्यतीत आता चार प्रमुख नगरसेविकांची नावे पुढे आली आहेत. यात रूपाली कुरील, वंदना अरुण मगरे, श्रद्धा साळवे आणि अॅड. रीमा खरात - काळे यांचा समावेश आहे. या चार नगरसेविकांपैकी कोणाच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडणार हे येत्या ९ फेब्रुवारी रोजी स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत तरी उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
दरम्यान, या चारही नगरसेविका अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आल्या आहेत, महानगर पालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत त्यांनी आपापल्या प्रभागात आपले वर्चस्व सिध्द केले. भारतीय जनता पार्टीकडून या चार नगरसेविकांची नावे अग्रक्रमाने पक्षश्रेष्ठीकडे पाठवण्यात आली आहे. पहिल्या महापौरपदाचे नाव वरिष्ठांकडून बंद लिफाफ्यात येणार आहे. या संदर्भात शहरातील नागरिकांमध्येही या बदलाबाबत चर्चा सुरू आहे. आता कोणत्या नगरसेविकेवर पक्षाचा शिक्का बसेल आणि जालनाला पहिली महिला महापौर म्हणून कोण नेतृत्व करेल, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि भाजपाचे जिल्हा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना महापालिकेवर आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी कसोशिने प्रयत्न केले.
जालना नगर परिषदेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर पार पडलेल्या पहिल्याच ऐतिहासिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ६५ पैकी ४१ जागा जिंकून दणदणीत बहुमत मिळवले आहे. या विजयानंतर आता सर्वांचे लक्ष जालन्याच्या पहिल्या महापौर आणि उपमहापौर निवडीकडे लागले असून, हा निवड कार्यक्रम ९ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडणार आहे.
जालना महानगरपालिकेचे पहिले महापौर पद अनुसुचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. या आरक्षणामुळे भाजपमधील अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. स्थानिक नेत्यांनी महापौरासाठी चार प्रमुख नावांची शिफारस पक्षाच्या वरिष्ठांकडे केली आहे. शहराचा पहिला नागरिक होण्याचा बहुमान कोणाला मिळतो, याकडे संपूर्ण जालनेकरांचे लक्ष लागले आहे. या निवडीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ काम पाहणार आहेत,
निवडणुकीचा कार्यक्रम
४ व ५ फेब्रुवारी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नामनिर्देशन पत्र (अर्ज) वितरित केले जातील.
४ ते ६ फेब्रुवारी : सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत अर्ज स्वीकारले जातील.
९ फेब्रुवारीः सकाळी ११ वाजता अर्जाची छाननी होईल. त्यानंतर १५ मिनिटांत अर्ज मागे घेण्याची मुदत असेल आणि त्यानंतर लगेचच मतदान होऊन पहिला महापौर व उपमहापौर निवडले जातील.