The challenge of maintaining the number of students before Zilla Parishad schools
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्हा परिषदेच्या शाळा १९ जूनपासून सुरू झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याने पटसंख्या टिकविण्याचे मोठे अव्हाण शिक्षण विभागासमोर आहे. जिल्ह्यातील ८२ शाळांमधे दहा पेक्षा कमी तर १५४ शाळांमधे २० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असल्याने शाळांमधे विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी शिक्षण विभागासह शिक्षकांना प्रयत्न करावे लागणार आहे.
जालना जिल्हा परिषदेच्या १ हजार ४९४ शाळा आहेत. या शाळांमधे शिक्षकांच्या वेतनावर होणारा खर्च, सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळेवर होणारा खर्च लक्षात घेता शासनावर कोट्यवधींचा बोजा पडतो. या पार्श्वभुमीवर सुरुवातीस शासनाकडून २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मात्र शासनाच्या या प्रयत्नास शिक्षक संघटनांकडुन विरोध झाल्यानंतर १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे इतर शाळांमध्ये समायोजन करून या शाळा बंद करण्याचा प्रयत्न करण्याचा घाट घालण्यात आला होता. त्यानंतर शासनाने एकही शाळा बंद होणार नसल्याचे जाहीर केल्याने विद्यार्थी व शिक्षकांना दिलासा मिळाला. त्यानंतर १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद न करता त्या एक शिक्षकी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मागील काही वर्षात शहरी व ग्रामीण भागात वाढत असलेले इंग्रजी शिक्षणाचे प्रस्थ जिल्हा परिषद शाळांसाठी अडचणीचे ठरत आहे. इंग्रजी शाळांची मोठी फिस भरुन पालक विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळांमधे प्रवेश देत असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांना अडचणीचे दिवस आले आहेत. जालना जिल्ह्यात ८२ शाळेत १० पेक्षा कमी तर १५४ शाळांमधे २० पेक्षा कमी पटसंख्या असल्याची धक्कादायक माहीती समोर आली आहे.
जिल्ह्यातील २४९ शाळांमधे २१ ते ३०, २४४ शाळांमधे ३१ ते ५०, २८९ शाळांमधे ५१ ते १००, २३१ शाळांमधे १०१ ते १५०, २४५ SCHOOL शाळांमधे १५० च्यावर विद्यार्थी संख्या आहे. जिल्हा परिषद शाळेमधे विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी यासाठी शासनाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येत असतांनाही पटसंख्या कमी होत असल्याने ही चिंताजनक बाब आहे. काही जिल्हा परिषद शाळांमधे शिक्षक व मुख्याध्यापक गैरप्रकार करीत असल्याच्या तक्रारी आहे. भोकरदन तालुक्यातील टाकळी येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक दारु पिउन शाळेत झोपल्याचा प्रकार नुकताच घडला आहे. अशा प्रकारामुळे पालकांचाही शाळेवरील विश्वास कमी होतांना दिसत आहे.
जालना जिल्ह्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्यध्यापकांच्या मंजुर ३२७पदांपैकी २९७ पदे कार्यरत तर ३० पदे रिक्त आहेत. गणित विषयाच्या शिक्षकांच्या मंजुर ३१९ पदापैकी २१७ कार्यरत तर ११२ पदे रिक्त असल्याची माहीती सुत्रांनी दिली. जिल्हा परिषद शाळेतील रिक्त शिक्षकांची संख्याही शाळेच्या प्रगतीस अडचणीची ठरत आहे.