मतदान झाले, आता गोळाबेरीज सुरु File Photo
जालना

मतदान झाले, आता गोळाबेरीज सुरु

स्थानिक प्रमुख नेत्यांसह उमेदवारांचे देव पाण्यात, कुठे तिरंगी तर कुठे चौरंगी लढत, उत्सुकता शिगेला,

पुढारी वृत्तसेवा

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्हयातील अंबड, परतूर आणि भोकरदन या तिन्ही नगरपालिकांसाठी सरासरी ७३.९४ टक्के इतके मतदान झाले. स्थानिक पातळीवर ताकद कोणाची हे पाहण्यासाठी भाजपाने तिन्ही नगरपालिकेत स्वबळ आजमावले तर अंबड वगळता महाविकास आघाडीचे दुसरीकडे सूर जुळून आले नाही. त्यामुळे भाजप आणि मित्र पक्ष तसेच महाविकास आघाडीतील मित्र पक्षांनी देखील जमेल त्या ठिकाणी युती आघाडी करून नगरपालिकेच्या निवडणुका लढवल्या.

आता मतदारांनी आपला अधिकार बजावल्यानंतर स्थानिक पातळीवरील विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांसह उमेदवारांनी मतांची गोळाबेरीज करणे सुरू केले आहे. येत्या २१ डिसेंबरला मतमोजणी लेणार असून तोपर्यंत नेत्यांसह उमेदवारांचे देव पाण्यात पडले आहेत. दरम्यान, तिन्हीं नगरपालिकेतील सुमारे २४१ जणांचे भवितव्य मंगळवार दि. २ रोजी मतपेटीत बंद झाले आहे. जालना जिल्ह्यातील अंबड, परतूर आणि भोकरदन नगरपालिकेत सत्ता मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाने आपले वर्चस्व पणाला लावले आहे. भोकरदन येथे तिरंगी लढत होत आहे.

भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट मैदानात आहे. परतूर मधेही तीच परिस्थिती आहे, अंबडमध्ये तिरंगी लढत पहायला मिळणार आहे. परतूरमध्ये भाजपाचे आमदार बबनराव लोणीकर आणि राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया यांचा कस लागणार आहे. अंबडमध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढवत असल्याचे आधीच स्पष्ट करण्यात आले होते.

येथे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार नारायण कुचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री राजेश टोपे यांनी नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी जोरदार प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. येत्या २१ डिसेंबर रोजी हा सगळा पसारा मोकळा होणार आहे. कोणाची सत्ता येते. मतदारांनी कोणाला कौल दिला याचा निर्णय २१ तारखेला मतमोजणीच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.

तूर्त तरी चर्चेला उधाण आले आहे. दावे प्रतिदावे, मतदानाची गोळा बेरीज, बूथनिहाय आकडेमोड करण्यात येत आहे. मतमोजणीच्या दिवशी कोणाचा सुपर संडे ठरणार हे कळणार आहे. तोपर्यंत पक्ष नेते आणि उमेदवारांचे देव पाण्यात पडले आहेत. येत्या २१ डिसेंबरपर्यंत स्ट्रॉगरुमध्ये मतदान यंत्रांना कडेकोट सुरक्षा देण्यात आली आहे. या ठिकाणी सीसीटीव्हीही बसवण्यात आले आहे. तिन्ही नगरपालिकेच्या शिलेदारांचे भवितव्य या मतदान यंत्रात बंद झाले आहे. सत्तेच्या सारीपाटावर कोण विजयी होईल, हे येत्या २१ डिसेंबर रोजी समजेल. तोपर्यंत निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. ही प्रतीक्षा नेत्यांसह उमेदवारांची घालमेल वाढवत आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT