जालना : मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच जालना जिल्ह्यात उन्हाचा तडाखा जाणवू लागला असून तापमानाचा पारा कमाल 35 अंश सेल्सिअस तर किमान 22 अंशांपर्यंत पोहोचला आहे. दिवसाढवळ्या उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे नागरिक हैराण झाले असून दुपारच्या वेळी रस्त्यांवरील वर्दळ कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
तापमानात झालेल्या वाढीचा परिणाम जिल्ह्यातील पाणीपुरवठ्यावरही दिसू लागला आहे. काही ग्रामीण भागांमध्ये पाण्याची टंचाई जाणवू लागली असून गावांमध्ये पाणी साठवण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू झाली आहे. विहिरी व बोअरवेलचे पाणी कमी होऊ लागल्याने ग्रामस्थांना चिंता सतावू लागली आहे. काही ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणीही स्थानिकांकडून केली जात आहे.
उन्हाची तीव्रता वाढल्याने शहरात रसवंतीगृह, लिंबूपाणी, उसाचा रस तसेच विविध शीतपेयांच्या दुकानांवर ग्राहकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. विशेषतः उसाचा रस, ताक, लिंबूपाणी आणि थंड पेयांची विक्री वाढली असून विक्रेत्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
दुपारच्या वेळी अनेक नागरिक उष्णतेपासून दिलासा मिळावा म्हणून थंड पेयांचा आस्वाद घेताना दिसत आहेत. दरम्यान, डॉक्टरांनीही वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी पिणे, हलका आहार घेणे तसेच डोके झाकून बाहेर पडावे असा सल्ला दिला आहे.
उष्माघातासारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी योग्य काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आगामी काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी उन्हापासून संरक्षणासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले जात आहे.
जालना शहरात पांढरे सुती रुमाल, टोप्या विक्रीसाठी आल्या आहेत. वाढत्या उन्हामुळे गॉगल्सच्या विक्रीतही वाढ झाल्याचे दिसून येत आहे.शहरात 99 रुपयांपासून गॉगलची विक्री होताना दिसत आहे.