जालना ः शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि वाढत्या महागाईच्या विरोधात सोमवार, दि. 18 रोजी जालना शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने मोती बाग परिसरात गळ्यात कांद्याच्या माळा परिधान करून राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे बीडकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक या आंदोलनात सहभागी झाले होते. ‘शेतकऱ्यांना न्याय द्या’, ‘महागाई कमी करा’, ‘कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.
वाढत्या खतांच्या किमती, शेतीमालाला मिळणारा कवडीमोल भाव, वीज बिलांचा गंभीर प्रश्न आणि सर्वसामान्यांना भेडसावणारी प्रचंड महागाई यामुळे शेतकरी आणि नागरिक पूर्णपणे त्रस्त झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
मोतीबाग परिसरात ऐन गर्दीच्या वेळी हे आंदोलन झाल्याने काही काळ वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती. बीडकडे जाणाऱ्या गाड्यांची लांब रांग लागली होती. यावेळी पोलिसांनी वाहतुक सुरळीत केली.
25 रु. किलोने कांदा खरेदी करा
आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या शिवसेनेच्या माजी कृषी सभापती तथा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनिष श्रीवास्तव यांनी केले. त्यांनी प्रशासनावर आणि कृषी विभागावर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले, “शासनाने घोषित केलेली सरसकट दोन लाख रुपयांची कर्जमाफी शेतकऱ्यांना तत्काळ मिळाली पाहिजे. आगामी पेरणीसाठी तात्काळ कर्ज उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. शासनाची 12 रुपयांची घोषणा केवळ कागदावरच आहे. सरकारने 25 रुपये किलोप्रमाणे कांदा खरेदी करावा आणि क्विंटलमागे 1500 रुपये अनुदान द्यावे, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली.
प्रशासकीय मलिदा लाटण्यावर टीका
जिल्ह्यात सुरू असलेल्या बोगस खतविक्रीवर महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख रुपम घुगे यांनी कृषी विभागाच्या कारभाराचे वाभाडे काढले.
जिल्ह्यात हजारो बोगस खतांच्या बॅगा पकडल्या गेल्या, खतांची 400 रुपये जादा दराने विक्री करून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. कृषी विभागाचे अधिकारी दुकानांवर केवळ कारवाईच्या नावाखाली मलिदा लाटून मोकळे होतात.
हा प्रकार थांबला नाही तर शिवसेना आपल्या स्टाईलने रुमणे हातात घेऊन आंदोलन करेल,‘असा इशारा त्यांनी दिला.