

राजेश जागरे
शहापूर: मुंबई-आग्रा महामार्ग व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या कामांदरम्यान झालेल्या मोठ्या प्रमाणातील वृक्षतोड आणि डोंगर कापण्यामुळे तसेच इतर प्रकल्प यामुळे शहापूर तालुक्यातील पर्यावरणाचा समतोल बिघडल्याचा आरोप स्थानिक नागरिक व निसर्गप्रेमींनी करत असून गारेगार शहापूरचा पारा हा 46 अंशावर गेला आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शहापूरमध्ये लवकरच भव्य मानवी साखळी आंदोलन उभारण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
शहापूर तालुक्यात झालेले विविध, महामार्ग प्रकल्प, भूगर्भातील अनाठायी होत असलेला पाणी उपसा तसेच मोठ्या प्रमाणावर झालेल्या वृक्षतोडीमुळे व डोंगर कापल्यामुळे तालुक्यातील पर्यावरणाचा समतोल बिघडल्याचा आरोप निसर्गप्रेमींनी केला आहे.
एकेकाळी थंड हवामानासाठी ओळखला जाणारा शहापूर तालुका आता वाढत्या तापमानामुळे अक्षरशः भट्टीसारखा तापत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. महामार्ग प्रकल्पांसाठी हजारो जुनी व डेरेदार झाडे तोडण्यात आली. त्या बदल्यात नवीन झाडे लावण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
मात्र प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड झालेली दिसून येत नसल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. परिणामी उन्हाळ्यात तापमानात लक्षणीय वाढ झाली असून काही भागांत तापमान 46 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत असल्याची नोंद असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर शहापुरातील नागरिक, विद्यार्थी, तरुण व निसर्गप्रेमी एकत्र येत या प्रश्नावर मोठे आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहेत.
शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘भव्य मानवी साखळी’ आंदोलनाचे नियोजन केले आहे. त्यासाठी प्राथमिक चर्चा व नियोजनासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठक शनिवारी 2 मे रोजी रात्री 9.30 वाजता शहापूर येथे होणार आहे. बैठकीत महामार्ग प्रकल्पांमुळे झालेल्या पर्यावरणीय हानीवर सविस्तर चर्चा करून मानवी साखळी आंदोलनाची तारीख, वेळ आणि ठिकाण निश्चित करण्यात येणार आहे. तसेच या प्रश्नाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधण्यासाठी पुढील रणनीती देखील ठरवली जाणार आहे.
आता एकत्र येण्याची वेळ
“शहापूरच्या भविष्यासाठी आणि पुढील पिढ्यांच्या श्वासासाठी आता एकत्र येण्याची वेळ आली आहे,” असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित राहावे, असेही आवाहन निसर्गप्रेमींकडून करण्यात आले आहे. आंदोलनात राजकारण बाजूला ठेवून समाजातील सर्व घटक सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.