जालना : स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या जीवनात अपेक्षित बदल झालेला दिसत नाही. कोरोनासारख्या कठीण काळात जेव्हा सर्वजण घरात होते, तेव्हा पोलीस आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांनीच रस्त्यावर उतरून आपले कर्तव्य बजावले. त्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांनी केलेल्या सेवेचा सन्मान राखला गेला पाहिजे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) शेरसिंग रुक्कानसिंग डागोर यांनी केले.
सोमवार, दि. 9 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., अपर पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी, अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्री. डागोर यांनी सफाई कर्मचाऱ्यांना देय असलेल्या विविध शासकीय योजनांची जिल्ह्यात त्वरित आणि प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश दिले. सफाई कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेतला. वारसा हक्क, लाड-पागे समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी, घरकुल योजना आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्य व सुरक्षा या विषयांवर त्यांनी सविस्तर चर्चा केली.
प्रशासनाने या घटकाकडे संवेदनशीलतेने बघून त्यांच्या अडीअडचणी प्राधान्याने सोडवाव्यात, जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी सफाई कामगारांच्या हितासाठी असलेल्या योजनांचा अहवाल नियमितपणे सादर करावा. जिल्ह्यातील सर्व नगर परिषदा व नगर पंचायती तसेच महापालिकेत कार्यरत स्वच्छता कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी आवश्यक सर्व सुरक्षा साधने पुरविणे बंधनकारक आहे.
सेवेत असताना त्यांचे वैद्यकीय देयके कालमर्यादेत अदा करावीत, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. या बैठकीस नगर परिषद व पंचायतीचे मुख्याधिकारी, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
आजही स्वच्छता कर्मचारी हक्काच्या घरापासून वंचित
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आवास योजनेची’ जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी. सफाई कामगारांना हक्काचे घर मिळावे यासाठी श्रम साफल्य योजना ही अत्यंत महत्त्वाची आहे. या योजनेअंतर्गत पात्र सफाई कामगारांना घराचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत. तसेच हा वर्ग आजही हक्काच्या घरापासून वंचित आहे. त्यामुळे प्रशासनाने 1987 च्या अधिनियमांतर्गत पात्र सफाई कामगारांना त्यांच्या घरांच्या जागांचे मालकी हक्क पट्टे त्वरित वाटप करावेत.