Sanitation and water supply workers face starvation; work stoppage continues for the second day
जालना, पुढारी वृत्तसेवा : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा२ आणि जल जीवन मिशन अंतर्गत महाराष्ट्राला देशपातळीवर नावलौकिक मिळवून देणाऱ्या स्वच्छता व पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांचे मागील पाच महिन्यांपासून मानधन प्रलंबित असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील कर्मचारी काम बंद आंदोलनावर गेले असून आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. या आंदोलनास महाराष्ट्र विकास सेवा अधिकारी वर्ग१ संघटना तसेच कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य जालना जिल्हा शाखेने लेखी पाठिंबा दिला आहे. शासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तात्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे.
ऑक्टोबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीतील मानधन अद्याप न मिळाल्याने कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांवर गंभीर आर्थिक संकट ओढवले आहे. घरभाडे, मुलांचे शिक्षण, वैद्यकीय खर्च तसेच दैनंदिन जीवनावश्यक खर्च भागवणे कठीण झाले असतानाही हे कर्मचारी ग्रामपंचायत, तालुका व जिल्हा स्तरावर नियमितपणे सेवा देत आहेत.
शासनाने स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांची ही आर्तहाक ऐकावी, अशी मागणी करण्यात येत आहे. या आंदोलनास महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी लिंबाजी बारगिरे, सचिव तथा सहाय्यक गटविकास अधिकारी समीर जाधव, तसेच कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य शाखेचे जिल्हाध्यक्ष विनोद भगत व जिल्हा उपाध्यक्ष गोविंद इंगळे यांनी लेखी पाठिंबा दिला आहे.
शासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात, अन्यथा आगामी काळात आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.
स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाची कामे ठप्प
प्रलंबित मानधन, सेवा सुरक्षा आणि भविष्यात नियमित मानधन वितरणाबाबत लेखी हमी मिळेपर्यंत दिनांक ४ ते ८ फेब्रुवारी दरम्यान जिल्हास्तरावर आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाशी संबंधित अनेक कामे ठप्प झाली आहेत.