पिंपळगाव रेणुकाई : पिंपळगाव रेणुकाई परिसरात कोवळ्या मिरचीच्या रोपांना उंदीर व सशांचा उपद्रव होत असल्याने मिरची उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहे.
भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरात मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड करण्यात आली आहे. मिरचीला चांगला भाव मिळत असल्याने यंदाही अनेक शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च करून मिरचीची रोपे लावली. मात्र लागवड केलेली कोवळी रोपे उंदीर, ससे व इतर प्राण्यांकडून उकरून टाकली जात असतानाच दुसरीकडे मल्चिंगचेही नुकसान होत असल्याने मिरची उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.
शेतकऱ्यांनी एकरी 30 ते 35 हजार रुपये खर्च करून रोपे लावली. पण रात्रीच्या वेळी मोठ्या संख्येने उंदीर शेतात घुसून रोपांची मुळे कुरतडून टाकत आहेत. ससेही मिरचीच्या रोपांचा कोवळा पाला खाऊन नुकसान करत आहेत. त्यामुळे दुबार-तिबार लागवड करावी लागत आहे. यामुळे मजुरी व रोपांचा दुहेरी खर्च वाढला आहे .
प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. वेळीच उपाय न झाल्यास मिरचीचे उत्पादन घटून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसेल, अशी भीती व्यक्त होत आहे.
आजूबाजूच्या शेतातील विहिरीतून पाणी घेऊन तीन एकरवर मिरचीची लागवड केली . मात्र उंदीर व ससा हे लागवड केलेल्या मिरचीची नासधूस करीत आहे . कृषी विभागाने मार्गदर्शन करावे.दीपक देशमुख, शेतकरी