Preparations for 'Bappa's' arrival are underway, yet security is being overlooked
जालना, पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सव अवघ्या बारा-तेरा दिवसांवर येऊन ठेपला असतानाही शहरातील गणपती विसर्जन कुंडाच्या तयारीकडे जालना महानगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. विसर्जनासाठी तयार करण्यात आलेल्या कुंडात सध्या पाणी गच्च भरलेले असून, परिसरात कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेच्या उपाययोजना दिसून येत नाहीत. तसेच कुंड परिसरातील सुशोभीकरणाचे कामही अर्धवट अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे.
गणपती विसर्जनाचा उत्सव जवळ आला कीच महापालिका प्रशासनाचे कुंडाकडे लक्ष जाते. वर्षभर या ठिकाणी कोणतीही देखभाल होत नसल्याने 'झोपी गेलेला प्रशासनाचा कारभार जागा होणार तरी कधी?' असा सवाल उपस्थित होत आहे.
जालना शहरताल गणेश मूर्तीचे विसर्जन सुरळीत व्हावे म्हणून तसेच मोती तलावाचे पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून तत्कालीन आयुक्त संतोष खांडेकर यांच्या कार्यकाळात या दोन कुंडाचे बांधकाम करण्यात आले. बांधकाम करते वेळी अनेक दिवास्वप्ने दाखविण्यात आली. प्रत्यक्षात वर्ष उलटूनही परिस्थिती फारशी बदललेली नाही.
मध्यंतरी महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत व इतर अधिकाऱ्यांनी कुंड परिसराची पाहणी केली होती. त्यानंतरही काहीच बदल झालेला दिसला नाही. विसर्जन कुंड वीस ते पंचवीस फूट खोल असून रस्त्या लगत आहेत. येथे कडक सुरक्षा उपाययोजना करण्याची गरज असताना महापालिकेकडून येथे कोणतीही उपाययोजना केलेली दिसून येत नाही.