वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मराठा समाजाला न्याय मिळू नये, म्हणून जी भूमिका घेतली आहे ती धक्कादायक आहे. ते म्हणतात सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी करू नका. त्यांचा पक्ष म्हणतो की, नोंदी रद्द करा. वंचित, गरजवंत घटकाला संविधानाने, कायद्याने अधिकार मिळाला पाहिजे. असे ते म्हणत होते. मात्र, आता त्यांनी बाजू बदलेली आहे, असे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आज (दि.१७) अंतरवाली सराटीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मराठा समाजाशी गोड गोड बोलायचे, मराठयांचे आंदोलन शांत करायचे, आश्वासने देऊन खूश करायचे आणि ती आश्वासने पाळायची नाहीत, असा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दुसरा डाव दिसतोय, असा आरोपही जरांगे यांनी यावेळी केला.
ते पुढे म्हणाले की, शरद पवारांनी काही केले नाही, असे सतत तुम्ही म्हणता. त्यांच्याकडे मोर्चा वळवता. परंतु, आता ते कुठे सत्तेत आहेत का ? असा सवाल करून सत्तेत तुम्ही आहात. त्यांनी काय नुकसान केले आहे, आम्हाला माहीत आहे. तुम्हाला परत तेच आता करायचे आहे का? मराठा ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात महाविकास आघाडीची आणि महायुतीची बैठक लावली होती. तेव्हापासून सगळे नेते मराठा समाजाच्या विरोधात बोलायला लागले आहेत. तुम्ही नेमकी बैठक कशासाठी घेतली. तोडगा काढायला, की मराठ्यांविषयी द्वेष ओकायला? असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी केला.
आम्ही पुढच्या तयारीला लागलो आहोत. विधानसभा निवडणुकीत तुम्हाला मराठ्यांची ताकद काय असते, ते समजेल. ओबीसीतूनच आरक्षण घेऊन मराठा समाजाला न्याय मिळवून देणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.