पिंपळगाव रेणुकाई: रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष केल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
पिंपळगाव रेणुकाई ते धावडा हा वर्दळीचा रस्ता असुन या रस्त्यावरुन दररोज शेतकरी, विद्यार्थी व नोकरदार ये-जा करतात. या रस्त्यावर खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांना दुचाकी चालवितांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.खराब रस्त्यामुळे या रस्त्यावर छोटे-मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत.
रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे तर काही ठिकाणी उंच भाग असल्याने रात्री वाहनचालकांना अपघाताचा धोका वाढला आहे.खराब रस्त्यामुळे वाहनांच्या दुरुस्तीचा खर्च वाढला आहे. गावकऱ्यांनी अनेकवेळा लेखी तक्रार करूनही रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले नाही.
पावसाळ्यापूर्वी डागडुजी न झाल्यास रस्ता पूर्णतः वाहतुकीस बंद होण्याची भीती आहे. शेतमाल बाजारात नेण्यास अडचणी येत असल्याने शेतकरी संतप्त आहेत. या रस्त्यावरून रुग्णवाहिकेलाही ये-जा करणे धोक्याचे बनले आहे. नागरिकांनी तातडीने रस्त्याचे डांबरीकरण करून जीवघेणे खड्डे बुजवावेत, अशी मागणी केली आहे. रस्त्याचे काम न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष घालून उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पिंपळगाव रेणुकाई- धावडा या रस्त्याच्या कामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना सांगितले होते. मात्र अद्याप पर्यंत हे काम करण्यात न आल्याने वाहनचालक व नागरीकांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर प्रसंगी तिव्र आंदोलन करणारकैलास ढमाले, अ.भा. मराठा महासंघ तालुका अध्यक्ष
पिंपळगाव रेणुकाई ते धावडा या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या रस्त्यावरुन वाहन चालवीणे धोकादायक बनले आहे. दुचाकीवरुन येतांना दुचाकी घसरुन अपघात झाला.मात्र सुदैवाने जास्त मार लागला नाही.प्रदीप बोर्ड, दुचाकीस्वार