water bill pudhari file photo
जालना

Water Bill Recovery Problem : थकीत पाणीपट्टी वसुलीचे पाटबंधारे विभागाला आव्हान

योजनांची कोट्यवधींची थकबाकी, नगर परिषद, ग्रामपंचायतींना सात दिवसांची अंतिम मुदत; पाणी, वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

संघपाल वाहूळकर

जालना : जालना पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून जिल्हाभरातील नगरपालिका, नगर पंचायती आणि ग्रामपंचायतींना पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र, या पाणी पुरवठ्यापोटी आतापर्यंत नियमित पाणी पट्टी न भरल्यामुळे संबंधित यंत्रणांकडे सुमारे 4 कोटी 93 लाख 76 हजार रुपये इतकी थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्याचे पाटबंधारे विभागाला आव्हान असणार आहे. 17 फेब्रुवारीपर्यंत केवळ एका ग्रामपंचातीकडून थकीत पाणीपट्टीची वसुली झाली आहे.

दरम्यान, जालना पाटबंधारे विभागांतर्गत गल्हाटी मध्यम प्रकल्प यासह इतर सहा मध्यम प्रकल्प व भारज लघु पाझर तलाव, कोनाड लघु पाझर तलाव आदींसह इतर लघु पाझर तलावांच्या माध्यमातून विविध प्रकल्पांद्वारे जालनासह परभणी जिल्ह्यातील नगर परिषद, नगर पंचायत आणि अनेक ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र संबंधित यंत्रणेकडून पाणीपट्टी भरण्यात सातत्याने टाळाटाळ होत असल्याचे उघड झाले आहे. परिणामी, पाटबंधारे विभागाची तब्बल 4 कोटी 93 लाख 76 हजार रुपयांची थकबाकी प्रलंबित आहे. 17 फेब्रुवारीअखेर केवळ बरंजळा साबळे ग्रामपंचायतीने वसुली केल्याचे अहवालावरून दिसून येत आहे.

गल्हाटी मध्यम प्रकल्पावर 10 ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करण्यात येतो. या 10 ग्रामपंचायतींकडे सुमारे 64 लाख रुपयांची थकबाकी आहे. अपर दुधना मध्यम प्रकल्पातून 9 ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांना पाणीपुरवठा करण्यात येतो. या 9 ग्रामपंचायतींकडेही सुमारे 32 लाख रुपये थकले आहेत. कल्याण मध्यम प्रकल्प आणि कल्याण गिरजा मध्यम प्रकल्पावर 6 पाणीपुरवठा योजनांचा भार आहे. त्यापोटी देखील 25 लाख रुपये थकवले गेले आहेत.

सर्वाधिक ग्रामपंचातीच्या पाणीपुरवठा योजना या जुई मध्यम प्रकल्पावर आहे. सुमारे 19 ग्रामपंचायती या धरणातून पाणी उपसा करून ग्रामस्थांना पिण्यासाठी उलब्ध करून देतात. मात्र, इतरांच्या तुलनेत कमी 44 लाख रुपयांची थकबाकी दिसून येत आहे. त्यानंतर धामणा मध्यम प्रकल्पावर सुमारे 12 ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठ्याचा भार आहे. त्यानंतर जिवरेखा मध्यम प्रकल्पावर 6 ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठ्याचा भार आहे.

या सात प्रकल्पांसह 20 पाझर तलावावर सुमारे 45 ग्रामपंचायत आणि अंबड नगर परिषदेचा भार आहे. भारज लघु पाझर तलावावर चार ग्रामपंचायतींची पाणीपुरवठा योजना सुरू आहे. त्यांच्याकडेही 12 लाख रुपयांची थकबाकी दिसून येत आहे. नेर ग्रामपंचातीकडे 20 लाख रुपयांची थकबाकी दिसून येत आहे. यांचीही थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे जालना पाटबंधारे विभागाने या पार्श्वभूमीवर कडक भूमिका घेतली असून सर्व थकबाकीदार ग्रामपंचायतींना सात दिवसांची अंतिम मुदत देण्यात आली आहे.

या कालावधीत थकबाकी न भरल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पाटबंधारे विभागाच्यावतीने देण्यात आला आहे. दरम्यान, पिण्याच्या पाण्यासारख्या अत्यावश्यक सेवेसाठी दिल्या जाणाऱ्या पुरवठ्याची जबाबदारी ओळखून ग्रामपंचायतींनी वेळेत पाणीपट्टी भरावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

अशी आहे थकबाकी

संस्था - थकबाकी

नगर परिषद परतूर - 36.21

नगर पंचायत मंठा - 25.29

वॉटर ग्रीड 95 गावे - 10.96

वॉटर ग्रीड 176 गावे - 63.00

वालसांगी ग्रा.पं. - 26.55

आन्वा ग्रा.पं.- 11.09

टेंभुर्णी ग्रा. पं.- 34.02

अकोला देव - 10.68

पिठोरी सिरसगाव -12.78

शहापूर - 12.00

वरुड खु. - 10.48

सिरसवाडी - 10.59

दरेगाव - 11.35

नेर - 20.93

राणी उंचेगाव -12.68

रोहिलागड - 10.99

रक्कम (लाखांत)

महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम नुसार संबंधित थकीत नगर पालिका, ग्रामपंचायतींवर बुधवार दि. 25 रोजीपासून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये केवळ पाणीपुरवठा बंद करण्यापुरतेच मर्यादित न राहता, संबंधित योजनांचा विद्युत पुरवठाही खंडित केला जाणार आहे. बिगर सिंचन पाणीपट्टीपोटी सुमारे 4 कोटी 93 लाख 76 हजार रुपये थकबाकी आहे.
राजेश गुजरे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, जालना.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT