पारध ः प्रकल्पातील पाणी कमी झाल्यामुळे सिमेंटचा बांधलेला पूल हा उघडा पडला.  pudhari photo
जालना

Padmavati Dam Water Level : पद्मावती मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा 28 टक्क्यांवर

12 ते 13 गावांवर पाणीटंचाईचे संकट, पाणी वाचवा अन्यथा संकट अटळ

पुढारी वृत्तसेवा

पारध ः भोकरदन तालुक्यातील अनेक गावांचा पाणीपुरवठा अवलंबून असलेल्या पद्मावती मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्यात दिवसेंदिवस मोठी घट होत असून सध्या धरणात केवळ 28 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे दर आठवड्याला धरणाच्या पाणीपातळीत चार ते पाच टक्क्यांनी घट होत असल्याने परिसरातील 12 ते 13 गावांवर पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सध्या जिल्ह्यात तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला असून उष्णतेची लाट अधिक तीव्र होत चालली आहे. परिणामी जालना जिल्ह्यातील अनेक लघु व मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. त्याचाच परिणाम पद्मावती मध्यम प्रकल्पावरही दिसून येत असून उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच धरणातील पाणीपातळी चिंताजनकरीत्या घसरली आहे.

या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये नागरिकांसह शेतकऱ्यांचीही चिंता वाढली आहे. पारध शिवारात उन्हाची तीव्रता आगामी काळात आणखी वाढल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने आतापासूनच योग्य नियोजन करून पाणीटंचाई टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

उपाय योजना करा

स्थानिक नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहनही करण्यात येत असून, पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन कोणती उपाययोजना करणार याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT