Overwhelming response to the 'Go-Samman' (Cow Honor) mega-rally in Jalna city
जालना, पुढारी वृत्तसेवाः सकल हिंदू समाजाच्या वतीने सोमवार, दि. २७ रोजी आयोजित करण्यात आलेल्या गो-सन्मान महारॅलीस जालनेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. श्री राम मंदिर येथून सकाळी ९ वाजता शोभायात्रेला प्रारंभ झाला. यावेळी हजारो नागरिक, युवक, महिला तसेच विविध हिंदू संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
शोभायात्रेदरम्यान सहभागी नागरिकांनी भगवे ध्वज हातात घेत 'गोमाता की जय', 'भारत माता की जय' अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. गोमातेच्या संरक्षणाचा आणि संवर्धनाचा संदेश देत शहरातील प्रमुख मार्गावरून ही महारॅली काढण्यात आली.
शोभायात्रा श्री राम मंदिर टांगा स्टैंड दाना बाजार - नया बाजार शोला चौक - नर नारायण मंदिर-बड़ी सड़क - मार्गे पुन्हा श्री राम मंदिर या मार्गाने काढण्यात आली. मार्गभर नागरिकांनी ठिकठिकाणी शोभायात्रेचे स्वागत करत पुष्पवृष्टी केली. गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा, गोवंश संरक्षणासाठी समाजाने एकत्र यावे आणि गोसेवेचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचावा, असे आवाहन यावेळी केले. संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
गो-सन्मान महारॅलीनंतर सकल हिंदू समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये गोमातेच्या साक्षीने सदरील निवेदन देण्यात आले असून महापौर वंदना मगरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी गोमातेचे संरक्षण करणे हे आपल्या सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे.
शहरांमध्ये कुठेही गोमाता भटक्या स्वरूपात फिरू नये यामुळे ते प्लास्टिक सारख्या वस्तू खातात. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. यामुळे केवळ गोमाता संरक्षक संस्थांवर अवलंबून न राहता सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा गोमातेचे संरक्षण करण्यासाठी गोमातेला चांगला सांभाळ करावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी स्टील असोसिएशनचे अध्यक्ष उद्योजक घनश्याम शेठ गोयल, राम मंदिरचे मनोज महाराज गौड, आमदार अर्जुन खोतकर, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे, शिवसेनेचे भास्कर आंबेकर, भाजप नगरसेवक अक्षय गोरंट्याल, नगरसेवक जगदीश भारतीय, नगरसेवक महावीर ढक्का, सिद्धिविनायक मुळे, विष्णू पाचफुले, अर्जुन डहाळे, गौरव देशमाने, अक्षय राजपुत, ऋषिकेश करपे यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.