जालना : शहरातील शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अनेक विद्यार्थी शाळेत ये-जा करण्यासाठी रिक्षा व खासगी वाहनांचा वापर करीत असून या वाहनांमधून क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात असल्याचे चित्र शहरातील विविध भागांत पाहावयास मिळत आहे.
शहरातील अनेक रिक्षांमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करतांना अक्षरशः कोंबून नेले जात आहे. काही ठिकाणी विद्यार्थ्यांची दप्तरे रिक्षांच्या बाहेर लोंबकळताना दिसत आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. काही रिक्षाचालक व खासगी वाहनचालक विद्यार्थ्यांना घेऊन भरधाव वेगाने वाहने सुसाट पळवीत असल्याचेही पहावयास मिळत आहे.
अशा प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.वाहतूक नियमांनुसार वाहनांची प्रवासी क्षमता निश्चित असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. कमी शुल्कात वाहतूक सेवा उपलब्ध होत असल्याने काही पालकही या धोकादायक प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेपेक्षा कोणतीही बाब महत्त्वाची नसल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.दरम्यान, शहर वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अशा वाहनांची विशेष तपासणी मोहीम हाती घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षा व खासगी वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी, तसेच चालकांना नियमांचे पालन करण्यास भाग पाडावे, अशी मागणी पालक व नागरिकांकडून होत आहे.शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी प्रशासन, वाहनचालक आणि पालक यांनी संयुक्तपणे जबाबदारी स्वीकारण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.