Municipal Corporation to remove encroachments, fine those burning waste
जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना महानगरपालिकेच्या वतीने शहरात स्वच्छता, श्रमदान मोहीम तसेच अतिक्रमण काढण्याची संयुक्त मोहीम राबविण्यात आली.. जिल्हाधिकारी तथा आयुक्त व प्रशासक श्रीमती आशिमा मित्तल यांच्या उपस्थितीत ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यात आली.
या मोहिमेअंतर्गत कन्हैया नगर टी पॉइंट, हनुमान घाट, जवाहर बाग, लालबाग आणि खांडसरी या भागांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्रमदान करून हा परिसर स्वच्छ केला. यावेळी चंदनजिरा विभागातील एकता चौक ते सुंदर नगर या मुख्य मार्गावर नागरिकांच्या सोयीसाठी रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली.
या मोहिमेत रस्त्यावर असलेले ५० दुकानांचे अतिक्रमण काढण्यात आले. मोठ्या इमारतींच्या अतिक्रमणधारकांकडून हमीपत्र घेण्यात येऊन त्यांना त्यांच्या स्तरावर अतिक्रमण काढून घेण्यासाठी ठराविक मुदत देण्यात आली आहे. महानगरपालिका प्रशासनातर्फे सर्व अतिक्रमणधारकांनी त्यांचे अतिक्रमण स्वयंस्फूर्तीने काढून घ्यावे, अन्यथा, मनपाकडून कठोर कारवाई करण्यात येईल असे अवाहन करण्यात आले.
सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याबद्दल शिंदे बाल रुग्णालय आणि शेख कलीम शेख नदीम यांच्यावर प्रत्येकी पाच हजार रुपये दंड लावण्यात आला. या मोहिमेत आयुक्त तथा प्रशासक आशिमा मित्तल, अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम, उपायुक्त नंदा गायकवाड, सहाय्यक आयुक्त अपर्णा जाधव, केशव कानपुडे यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी आणि सर्व स्वच्छता निरीक्षक व सफाई कर्मचारी उपस्थित होते.
जालना जिल्हाधिकारी तथा शहर महापालीका आयुक्त अशिमा मित्तल यांनी पदभार स्विकारल्यानंतर जालना शहरात विविध भागात स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे. यामुळे शहरातील शेकडो टन कचना उचलुन त्याची विल्हेवाट लावली जात आहे. शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी पुढाकार घेतल्याने त्यांच्या या कार्यात नागरीकही सहभाग घेत आहेत.
कचरा जाळू नये
जिल्हाधिकारी तथा महापालीकेच्या आयुक्त श्रीमती आशिमा मित्तल यांनी शहरातील नागरिकांनी कचरा जाळणे पूर्णपणे थांबवावे असे आवाहन केले आहे. सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणासाठी कचरा जाळणे अत्यंत हानिकारक असून शहरात कुठेही कचरा जाळताना आढळून आल्यास, संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे. नागरिकांनी अशा घटना मनपाच्या निदर्शनास आणून दिल्यास योग्य ती कार्यवाही केली जाईल असेही त्यांनी सांगीतले.