Municipal Corporation notices to owners of 931 dangerous buildings
जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना शहरातील जुन्या व नवीन जालन्यात ९३१ जुन्या इमारती जीर्ण व धोकादायक बनल्या असून महापालिकेच्यावतीने या इमारतीच्या मालकांना महापालिकेच्यावतीने इमारत दुरुस्ती व पाडण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
जालन्यात धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आहे. शहरात ९३१ जुन्या इमारती धोकादायक बनल्या आहेत, ज्या पावसाळ्यात कोसळण्याचा धोका आहे. त्यामुळे, या इमारतींमधील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या इमारतीची डागडुजी किंवा दुरुस्ती करणे आवश्यक आहे. या इमारती पावसाळ्यात कोसळण्याची शक्यता असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा गंभीर बनला आहे. धोकादायक झालेल्या काही इमारतीत नागरिक राहात आहेत. गेल्या काही दिवसांपासून रिमझिम पाऊस कोसळत असल्याने हा पाऊस थेट इमारतीच्या पायापर्यंत पोहचत आहे. या इमारतीचे स्लॅब कोसळण्याची भीती नाकारता येत नाही. धोकादायक इमारतींमध्ये राहणारे नागरिक जीव-घेण्या स्थितीत जगत आहेत.
महापालिकेच्यावतीने शहरात धोकादायक बनलेल्या इमारतींचा सर्व्हे करण्यात आला असून ९३१ इमारत मालकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या नोटीसमधे इमारत मालकांनी त्यांच्या स्तरावर इमारत पाडण्याचे सूचित करण्यात आले आहे. काही जुन्या इमारतीच्या जागांचे वाद असल्याने वर्षानुवर्षे त्या तशाच उभ्या आहेत. या इमारतीच्या दुरुस्ती व डागडुजीसाठी कोणीही पुढे येत नसल्याने इमारती कोसळण्याची भीती कायम आहे. जीर्ण इमारतीच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांनाही जीव मुठीत धरून जगावे लागत आहे.
जालना जिल्ह्यात १३ ते १६ ऑगस्ट दरम्यान यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यावेळी काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने धोकादायक इमारतीत राहणाऱ्यांचा जीवा टांगणीला लागला आहे. नोटीस देऊनही इमारता मालक इमारतीची डागडुजी, दुरुस्ती अथवा पाडकाम करीत नसल्यास महापालिकेने पुढाकार घेण्याची गरज आहे.
कारवाई होणे गरजेचे
जालना शहरातील काही इमारती मुख्य रस्त्यावर उभ्या आहेत. या इमारती कोसळल्यास मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे. या बाबत इमारत मालकांसह महापालिकेने लक्ष देणे गरजेचे आहे. महापालिकेने नोटीस दिल्यानंतरही इमारत मालक कोणतेही पाऊले उचलत नसेल तर महापालिकेने पुढे येऊन कारवाई करणे गरजेचे आहे.