आन्वा : १५ एप्रिलपासून लालपरीतून होणारा गरिबांचा प्रवास १० टक्क्यांनी महागला आहे. ही हंगामी दरवाढ साधी, जलद व रात्रसेवेतील साधारण बससाठी लागू करण्यात आली आहे. राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या तिकीट दरामध्ये १५ जूनपर्यंत ही भाडेवाढ कायम राहणार आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गावाला जाताना प्रवाशांना अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत.
लग्नदराई आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांच्या खिशाला अधिक भार पडणार आहे. दरम्यान शाळा, महाविद्यालयीन उन्हाळी परीक्षा संपल्या की विद्यार्थी व नागरिक लग्न व विविध कार्यक्रमांसाठी गावी जाण्याचे बेत आखतात. त्यामुळे बसस्थानकांवर प्रवाशांची अधिक गर्दी होते. एसटी महामंडळाची बस खेड्यापाड्यापर्यंत अगदी घरापर्यंत नागरिकांना पोहोचवत असल्याने सर्वांसाठी सोयीची ठरते. तसेच विमा योजना, प्रवास दरातील विविध सवलतींमुळे महिलांना ५० टक्के सवलत यामुळे प्रवाशांची पहिली पसंती एसटीला मिळताना दिसते. परंतु याच संधीचा फायदा घेत एसटी महामंडळाने हंगामी भाडेवाढ लागू केली आहे. परंतु या दरवाढीतून सर्वप्रकारच्या वातानुकूलित बसना वगळण्यात आले आहे. भाडेवाढीमुळे गरिबांना फटका बसणार आहे.
प्रवाशांना आर्थिक झळ
राज्य परिवहन महामंडळाच्या बस खऱ्या अर्थाने राज्याची जीवनवाहिनी मानल्या जातात, विशेषतः ग्रामीण भागात आजही वाहतुकीचे प्रभावी, परवडणारे साधन म्हणून एसटीकडे पाहिले जाते. प्रत्येक गावात एसटीचे जाळे पसरले असल्यामुळे आणि ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक एसटीने प्रवास करण्यास पसंती देतात. मात्र, आता ऐन लग्नसराई आणि सणासुदीच्या दिवसांत एसटीची भाडेवाढ झाल्यामुळे याची आर्थिक झळ ग्रामीण भागातील नागरिकांना सोसावी लागणार आहे. परिणामी, आर्थिक दुर्बल घटकांचा प्रवास काही प्रमाणात महागला आहे.