

रत्नागिरी : उन्हाळी सुट्ट्यांचा कालावधी सुरू होताच आपल्या गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढती गर्दी लक्षात घेता रत्नागिरी विभागाने 15 एप्रिल ते 15 जूनपर्यंत जादा एसटी बसेसचे नियोजन केले आहे. जिल्ह्यातील 9 आगारांतून तब्बल 700 एसटी बसेस सोडण्यात येणार आहे.
रत्नागिरी विभागातून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, मुंबईसह अन्य ठिकाणी लालपरी धावणार असून ऑनलाईन बुकींगला सुरूवात झाली असून प्रवाशांनी गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन बुकींग करून प्रवास करावा, असे आवाहन एसटी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. उन्हाळ्यात शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टया लागल्यानंतर अनेक कुटुंबे गावाकडे किंवा पर्यटनासाठी बाहेर पडतात. तसेच कोकणात अनेक विद्यार्थी, शिक्षक, कामगार वर्ग कामासाठी आला आहे. उन्हाळ्या सुट्टीत प्रत्येकांना आपल्या घरी जाण्याची ओढ असते. त्यामुळे रेल्वे आणि खासगी वाहनांबरोबरच लाडक्या लालपरीला प्रवासी नेहमीच पसंती देतात. सुट्या सुरू होण्याआधीच रेल्वेचे बुकींग फुल्ल झालेले आहे. प्रवाशांना एसटी बसचा प्रवास सुरक्षित आणि नवीन बस ताफ्यात दाखल झाल्यामुळे प्रवास आरामदायी झाला आहे.
उन्हाळ्या सुट्टी बसस्थानकावर वाढती गर्दी लक्षात घेता प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशासनाने अतिरिक्त बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑनलाईन बुकींगला सुरूवात झाली असून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. उन्हाळ्यात ज्येष्ठ नागरिक, महिलांना तिकीटात सवलत मिळणार आहे.