Garbage Collection : कचरा संकलनात डिजिटल युगाची वाटचाल ; जीपीएसद्वारे घंटागाड्यांवर मनपाची नजर File Photo
जालना

Garbage Collection : कचरा संकलनात डिजिटल युगाची वाटचाल ; जीपीएसद्वारे घंटागाड्यांवर मनपाची नजर

फक्त ४५ गाड्यांवर संपूर्ण शहराचा भार

पुढारी वृत्तसेवा

Moving towards the digital age in garbage collection; Municipal Corporation will keep an eye on the bell carts through GPS

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना शहराच्या वाढत्या लोकसंख्येसह वाढलेली कचऱ्याची समस्या आणि नागरिकांची तक्रारी लक्षात घेता महापालिकेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शहरातील कचरा संकलनासाठी कार्यरत असलेल्या ५२ घंटागाड्यांवर आता जीपीएस ट्रॅकर बसवण्यात आले असून, त्यांच्यावर थेट नियंत्रण ठेवता येणार आहे.

महापालिकेकडे एकूण ८२ घंटागाड्या आहेत. मात्र त्यातील ३० गाड्या अत्यंत खराब अवस्थेत असून त्या भंगारात जमा होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी, सध्या केवळ ५२ गाड्यांच्या माध्यमातून संपूर्ण शहराचे कचरा संकलन सुरू आहे. त्यातही दैनंदिन चार ते पाच गाड्या किरकोळ कारणांमुळे बंद पडतात. अशा परिस्थितीत फक्त ४५ गाड्यांवर संपूर्ण शहराचा भार आहे.

'घंटागाडी आमच्या भागात आली नाही' अशा तक्रारींनी मनपाचे दरवाजे सतत ठोठावले जात होते. यावर तोडगा म्हणून महापालिकेने जीपीएस ट्रॅकिंग यंत्रणा सुरू केली आहे. यामुळे घंटागाडी कुठे आहे, किती वेळ थांबली, किती किलोमीटर फिरली, ठराविक भागात गेली का नाही यावर थेट नियंत्रण ठेवता येणार आहे.

जालना शहरात महापालिकेच्या कर विभागाकडे ६८ हजारांहून अधिक मालमत्ता नोंदणीकृत आहेत. त्यामुळे दररोज सुमारे १२० ते १५० टन कचरा तयार होतो. या कचऱ्याचे संकलन करण्यासाठी सध्या फक्त ५२ घंटागाड्या, २२ ट्रॅक्टर, ६ टिप्पर आणि ३ कम्पेक्टर उपलब्ध आहेत. मात्र, ही यंत्रणा देखील अपुरीच ठरत असल्याने शहरातील चौकाचौकांत कचऱ्याचे ढीग पहायला मिळत आहेत.

'किमान १०० घंटागाड्यांची गरज'

शहराचा झपाट्याने होत असलेला विस्तार लक्षात घेता सध्या कार्यरत असलेल्या गाड्यांची संख्या अपुरी आहे. शहरात एकाचवेळी नियमितपणे कचरा संकलन करायचे असेल, तर किमान १00 घंटागाड्यांची आवश्यकता आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासन आणि जिल्हा नियोजन समितीकडून अधिक ५० घंटागाड्यांसाठी निधी मंजूर करून घेणे आवश्यक आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नेतेमंडळींनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

डिजिटल ट्रेकिंगमुळे पारदर्शकता वाढणार

जीपीएस यंत्रणेचा मुख्य फायदा म्हणजे पारदर्शकतेत वाढ होईल. नागरिकांच्या तक्रारी तपासणे सोपे होईल. यामुळे घंटागाडी वेळेवर आली नाही, ती भागात पोहोचली की नाही याची माहिती लगेच मिळणार आहे. कचरा संकलनाच्या कार्यक्षमतेत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT