Monkeys are causing havoc in the Nalvihira area
जालना, पुढारी वृत्तसेवा
जाफराबाद तालुक्यातील नळविहिरा व परिसरात माकडांचा प्रचंड उच्छाद वाढला असून शेतकरी व ग्रामस्थ अक्षरशः त्रस्त झाले आहेत. माकडांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी अॅग्रोव्हिजन गटशेती संघाच्या वतीने ग्रामसभेच्या ठरावासह वनपरिक्षेत्र कार्यालयाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
अॅग्रोव्हिजन गटशेती संघाचे संस्थापक प्रमुख संजय मोरे यांनी शुक्रवार, दि. ३० जानेवारी रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी, प्रादेशिक जालना (उत्तर) यांच्या कार्यालयात : निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, नळविहिरा परिसरात माकडांच्या अनेक टोळ्यांनी धुमाकूळ घातला असून कपाशी, मका यांसह आंबा, आवळा यांसारखी फळपीके मोठ्या प्रमाणात नष्ट केली जात आहेत.
माकडे आता माणसांवरही हल्लक पवित्रा घेत असून महिला व लहान मुलांच्या अंगावर धावून येत आहेत. त्यामुळे महिलांमध्ये शेतात जाण्याची भीती निर्माण झाली आहे. आधीच हरीण, रानडुक्कर व निलगाय यांच्या नुकसानीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर आणखी संकट ओढावले आहे. त्यामुळे नळविहिरा व परिसरातील सर्व माकडे तातडीने पकडून नेण्यात यावीत, अशी ठाम मागणी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.