Meeting to Reduce Accidents
जालना, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून, अपघात प्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट्स) निश्चित करून त्यावर तातडीने योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कनवारिया यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कनवारिया, महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बालाजी धनवे, वाहन निरीक्षक दीपक जाधव तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अभियंता उपस्थित होते.
वाहतुकीच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या उघड्या विहिरींमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्याचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. या सर्वेक्षणात आढळलेल्या धोकादायक विहिरींवर आता जीव संरक्षक यंत्रणा कार्यान्वित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात येत आहे.
रस्ते सुरक्षेचा आढावा केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी रस्ते सुरक्षा समितीची नियमित बैठक घेतली जाणार आहे. बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिका प्रशासनाला रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, आवश्यक तिथे गतिरोधक बसवणे आणि दिशादर्शक फलक लावण्याचे कडक निर्देश यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
कारवाई करावी
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस आणि उप प्रादेशिक परिवहन विभागाने संयुक्तपणे मोहीम राबवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी दुचाकी चालविताना स्वप्रेरणेने हेल्मेट परिधान करावे, अशी सूचनाही यावेळी करण्यात आली.