Measures for scarcity relief in 701 villages and hamlets.
जालना, पुढारी वृत्तसेवा बदलत्या हवामानाचा परिणाम आणि पर्जन्यमानातील अनियमितता यामुळे जालना जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर होत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जालना जिल्ह्यातील ७०१ गावे व वाड्यावस्त्यांसाठी पाणीटंचाई निवारणाचा व्यापक आर ाखडा तयार केला असून यासाठी १६ कोटी ४९ लाख ५७ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
दरम्यान, या पाणी टंचाई आर-ाखड्यात टंचाईसदृश्य गावे निश्चित करण्यात आली असून टंचाई निवारणासाठी विविध उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे. यात नवीन विहिरी खोदणे, जुन्या विहिरींची दुरुस्ती, विहिरी खोल करणे, गाळ काढणे, नळयोजना दुरुस्ती, वात्पुरत्या नळयोजना उभारणे, खाजगी विहिरी अधिग्रहण तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठा यांचा समावेश आहे. विशेषतः टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी तब्बल ९ कोटी ९५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
आकडेवारीनुसार, जिल्ह्यात ७३१ विहिरी अधिग्रहित करण्यात येणार असून त्यासाठी २ कोटी ३७ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. याशिवाय ५६१ विहिरींच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असून त्यासाठी ३ कोटी ४३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच १४० विविध उपाययोजना राबवण्यात येणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने हा सविस्तर आराखडा तयार करून त्यास मंजुरी दिली आहे. प्रशासनाने या उपाययोजनांद्वारे टंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचे नियोजन केले आहे.
दरम्यान, जल हे जीवन आहे असे नेहमी म्हटल्या जाते. त्यानुसार नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर काटकसरीने करावे. येत्या काळात उन्हाची तिव्रता वाढणार आहे. यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला असला तरीही नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे पाणी बचत करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
७३१ विहिरी अधिग्रहण, ५६१ दुरुस्ती
टंचाईसदृश्य गावे व वाड्यांची नोंद प्रशासनाकडून करण्यात आली असून ७३१ विहिरी अधिग्रहण, ५६१ दुरुस्ती, १४० उपाययोजना प्रमुख योजना राबवण्यात येणार आहे. यात नवीन विहीर खोदकाम, विहिरी विशेष दुरुस्ती, नळयोजना दुरुस्ती व तात्पुरत्या योजना, खाजगी विहिरी अधिग्रहण, टँकरद्वारे पाणीपुरवठा जलसंधारण व जलशुद्धीकरण, विहिरी खोल करणे, गाळ काढणे आदी कामे केली जाणार आहेत.