वडीगोद्री : मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीस यांचे नकली भांडण सुरु आहे. असे विधान प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना केले होते. या विधानाला आज (दि.२९) मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. आरोपाला मी कुठपर्यंत उत्तर देत बसू. माझे काम गोर-गरिबांसाठी सुरू असून ते कायम सुरू ठेवणार आहे. पण आमच्या जीवावर निवडून यायचा कुणाचा डाव असेल तर तो आम्ही यशस्वी होऊ देत नाही, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आंबेडकर यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
तसेच आमचे ध्येय ओबीसीतून आरक्षण मिळवण्याचे आहे. पुढे काय करायचे ते आम्ही २९ ऑगस्टला ठरवणार आहोत. सरकारने कितीही ट्रॅप लावले तरी मी हटणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले. अंतरवाली सराटी येथे ते माध्यमांशी बोलत होते.
मला माझ्या समाजाची शक्ती वाढवायची आहे, ते माझं स्वप्न आहे. समाज मोठा होऊ नये हे अनेकांचे स्वप्न आहे. आमदार बच्चू यांनी तिसऱ्या आघाडीचं निमंत्रण दिलं असलं तरी, याबाबत २९ ऑगस्टला समाजाच्या बैठकीत निर्णय घेणार आहे. प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आरोपावर माझा विश्वास बसत नाही. तिसऱ्या आघाडीत जायचं की, आणखी काय करायचं याबाबत २९ ऑगस्टला निर्णय घेऊ. समाजाची मोठी जबाबदारी माझ्यावर असल्यानं मला उतावळेपणा करता येणार नाही, असेही ते म्हणाले.
भाजपा नेत्या आ.पंकजा मुंडे यांच्या बाबतीत कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मी देत नाही, ज्या जातीने मदत केली, मोठे केले, त्या जातीला विरोध करणाऱ्यांच्या विरोधात मी बोलत नाही. आरक्षणाला कोण विरोध करत आहे. हे सामान्य जनतेने समजून घेणं महत्वाचं आहे, असं आवाहन देखील जरांगे पाटील यांनी केले.