तळणी : मंठा तालुक्यातील हत्ता-साखरा-तळणी या राज्य मार्गाचे काम प्रगतीपथावर असून, देवठाणा रस्त्यावरील निर्माणाधीन पुलाच्या बांधकामाचा दर्जा व उंचीबाबत आक्षेप घेत शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता. २८) सकाळी ११ वाजता पुलावरच उपोषण सुरू केले.
दरम्यान, देवठाणा-तळणी हा वाहतुकीचा रस्ता खोदून बंद करण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. पुलाची उंची व बांधकामाची पद्धत योग्य नसल्याने पाण्याचा निचरा तसेच शेतकऱ्यांच्या शेतीकडे जाणारा पारंपरिक वहिवाटीचा मार्ग बंद झाल्याचा आरोप शेतकरी विष्णुसिंह चव्हाण यांनी केला आहे.
या प्रश्नावर शेतकऱ्यांनी २० व २७ जुलै तसेच २७ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांसह एमएसआयडीसी व लोकप्रतिनिधींकडे निवेदने दिली होती. मात्र, तक्रारीची गांभीर्याने दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे. यासंदर्भातील व्हिडिओही सोशल मीडियावर प्रसारित करण्यात यांच्यासह अनेक शेतकरी उपोषणाला बसले आहेत.
पुलाच्या कामाची पाहणी करून वहिवाटीचा मार्ग व पाण्याचा निचरा सुरळीत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी या रस्त्याचे काम करणारी कंपनी, पोलीस प्रशासन, एमएसआरडीसीचे अधिकारी यांच्यात बैठक होऊन काम सुरू करण्याचे ठरले. बैठकीत एकाही मुद्यावर एकमत न झाल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला.
शुक्रवारी रस्त्याच्या मधोमध उपोषण
सुरू करण्यात आल्याने देवठाणा, उस्वद परिसरातून येणाऱ्या वाहनांना अडचणीचा सामना करावा लागला. यावेळी उपोषण स्थळी पोलिस प्रशासन किंवा अन्य कोणत्याही संबंधित अधिकाऱ्यांनी भेट दिली नाही.