वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा: सगेसोयरे अंमलबजावणी करण्यासाठी मुंबईत धडक मारण्यासाठी पहिल्या वेळी महिलांचा सहभाग नव्हता. आता महिलांनी आपल्या लेकरांना न्याय देण्यासाठी मुंबईत धडक मारण्याचे ठरवले आहे. महिलांसह मराठा समाज मुंबईत जाण्यासाठी सज्ज झाला आहे. पहिले सरकारचे ऐकून मागे आलो. आता समाज सांगेल, तेव्हा माघारी फिरणार असल्याचे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी सांगितले. ते आज (दि. २६) अंतरवालीत पत्रकारांशी बोलत होते.
वंचित बहुजन आघाडीने विरोधात का भूमिका घेतली माहिती नाही. परंतु प्रत्येकाला लोकशाहीने मत मांडण्याचा अधिकार दिलेला आहे. कुणबी प्रमाणपत्र, तसेच सगेसोयरे अंमलबजावणीचा अध्यादेश रद्द करण्याची मागणी त्यांनी केली असली, तरी मात्र, कुणबी प्रमाणपत्र रद्द होणार नाही. सगेसोयरेचा शब्दांची अंमलबजावणी ही 100 टक्के होणार आहे. मी पूर्वीही प्रकाश आंबेडकर यांचा सन्मान करत होतो. आताही करत आहे.
सरकारने नवीन नोंदी तपासणीसह सर्वच काम सध्या बंद करून मराठा समाजावर अन्याय केला आहे. सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने १३ जुलैपर्यंत मुदत घेतली आहे. तरीही सरकारकडून अद्याप कुठलाही संपर्क साधला गेला नाही. सरकार काम करत नसून मराठा कुणबी नोंदी सापडल्या तरी प्रमाणपत्र देत नाही. ज्यांच्याकडे ते आहे, त्यांना जातपडताळणी सुध्दा ओबीसी नेत्यांच्या दबावापोटी बंद केली असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
विधानसभा निवडणुकीत २८८ जागा लढविण्यासाठी मतदार संघाची चाचपणी चार टप्प्यात केली आहे. निवडणूक लढवायची का? याबाबत पहिल्या रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करुन त्यानंतर मराठा समाजाची बैठक घेऊन निर्णय घेणार आहे. २८८ उमेदवार उभे करायचे की, पाडायचे हे एकदा बैठकीत ठरले की, तो निर्णय अंतिम राहील. त्यात बदल होणार नसल्याचे जरांगे यांनी सांगितले.