वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : मी काही सरकारसमोर झुकत नाही, टाका आता जेलमध्ये. मी असेल नसेल मराठ्यांनी जातीची शान राखावी. सरकार पुन्हा येणार नाही म्हणून मला जेलमध्ये टाकून त्यांना निवडणूक लढवायची आहे. परंतु, वेळ प्रसंगी आम्ही ओबीसींना निवडून आणू. पण तुम्हाला मतदान करणार नाही, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आज (दि.२४) दिला. पाचव्या दिवशी पाचवे उपोषण स्थगित केले त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
ते (Manoj Jarange) पुढे म्हणाले की, निवडणूक जवळ आली असताना सलाईन लावून येथे पडून राहणे म्हणजे बेगडीपणा आहे. रस्त्यावर उतरून लढाईसाठी तयारीला लागावे म्हणून उपोषण स्थगित केले आहे. मला अटक करण्यासाठी प्रवीण दरेकर यांनी अभियान सुरू केले आहे.
जालना येथे नाटक केले, तेव्हा आम्ही मुलं होतो. मराठवाड्यात आम्ही हे नाटक दाखवण्याची हिम्मत केली. या कार्यक्रमात तोटा झाला. काही जणांनी पैसे चोरले. या कार्यक्रमाचा गल्ला माझ्याकडे नव्हता. या प्रकरणात आम्ही जनजागृतीसाठी प्रामाणिकपणे काम केले. पण तोटा झाला. आम्ही आलेले पैसे ज्याला त्याला वाटून दिले. पण काहींनी पैसे दिले नाही. मागच्या वेळी न्यायालयाचा सन्मान केला कोर्टात गेलो. मग आता वॉरंट का काढता. कोपर्डी प्रकरणात का न्याय दिला नाही. पोलीस खाते फडणवीस यांच्याकडे आहे. त्यामुळे दरेकर यांचे मला अटक करण्याचे अभियान सुरू आहे. हा गृहमंत्री फडणवीस यांचा डाव आहे, असा आरोप जरांगे (Manoj Jarange) यांनी केला.
नाटकाला 15-16 वर्ष झाले, आताच वॉरंट का काढले. कोर्टाने हजर राहून पैसे भरायला रिसतर लावायला पाहिजे होते. पण त्यांनी अटक वॉरंट काढले. कोर्ट म्हणजे हुकूमशहा आहे का ?, असा सवाल त्यांनी केला. आम्ही जे केले. ते प्रमाणिकपणे जनजागृतीसाठी केले, कारण तो सांस्कृतिक कार्यक्रम होता. त्यामुळे शिवछत्रपतींच्या नाटकासाठी मी तुरुंगात जायला तयार आहे, असे जरांगे (Manoj Jarange) म्हणाले.