वडीगोद्री,पुढारी वृत्तसेवा : मी जीवघेणा प्रवास सुरू केलाय, तुम्ही आरक्षण नाही दिले ना, मग तुमचे बारा-तेरा वाजल्याशिवाय सोडणार नाही. मराठा समाजाच्या मागण्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे. नाही तर मराठे विधानसभा निवडणुकीत तुमची वाट लावतील, असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी दिला. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी आज (दि.१८) ते माध्यमांशी बोलत होते.
आमचे आंदोलन एक वर्षापासून सुरु आहे. तुम्ही मराठ्यांना मूर्ख समजता का? आम्ही सहकार्याचीच भूमिका घेतली आहे. आम्हाला काहीतरी मर्यादा आहेत, आमच्यावर काही समाजाची जबाबदारी आहे. आम्ही वर्षभर तुम्हाला मदत आणि सहकार्य करत आहोत, तरीसुद्धा तुम्ही सहकार्यच करा म्हणत असाल तर कोणते सरकार तुम्ही चालवता ? आणि कशाला चालवता ? असा सवाल जरांगे (Manoj Jarange) यांनी केला.
निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या आत आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा. येत्या दोन चार दिवसांत आमचा विषय संपवा. मी आता राजकीय भाषा करत नाही. मी रस्त्यावर ,राजकीय वाटेवर आलो तर खेळ खाल्लास होईल, असा इशारा यावेळी जरांगे यांनी दिला.