२९ सप्टेंबरपासून आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे. Pudhari News Network
जालना

मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा: २९ सप्टेंबरपासून आमरण उपोषण करणार

पुढारी वृत्तसेवा

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण आणि समाजाच्या विविध मागण्या पूर्ण न झाल्यास २९ सप्टेंबरपासून पुन्हा आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे - पाटील यांनी आज (दि. २९) केली आहे. अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलनाच्या वर्षपूर्ती निमित्त आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी गोदाकाठच्या १२३ गावातील हजारो मराठा बांधव उपस्थित होते.

भाजपचे सगळे आमदार पाडा 

यावेळी ते पुढे म्हणाले की, सरकारने सगे सोयरे अंमलबजावणी करावी. २००४ च्या जीआरची दुरूस्ती करावी. त्यात शिथिलता आणावी. दि.२९ सप्टेंबरच्या आत हैद्राबाद, सातारा, बॉंबे गॅझेट लागू करावी, आदी मागण्या सरकारने पूर्ण कराव्यात. मराठ्यांच्या विरोधात बोलणारे भाजपचे सगळे आमदार पाडा, असे आवाहन ही जरांगे यांनी यावेळी केले. आता आरपारची लढाई होणार आहे. मराठ्यांनी अशीच एकजुट ठेवा. राजकारणासाठी एकजूट फुटू देऊ नका, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

काँग्रेस सारखे भाजपचे हाल होतील

शिंदे समितीला मुदतवाढ देऊनही ही समिती रेकॉर्ड तपासत नाही. सगे सोयरे अंमलबजावणी केली नाही. मराठा आरक्षण द्या, नाहीतर काँग्रेसचे आधी जसे हाल झाले होते, तसे भाजपचे हाल होतील, असा इशारा त्यांनी दिला. सगे सोयरे आरक्षण कायद्यात बसत नाही म्हणता, मग तुम्ही राज्यपालांच्या स्वाक्षरीने अधिसूचना काढली कशी? टिकत नव्हती, तर तेंव्हाच काढायची नाही, असेही ते म्हणाले.

राजकोटला रविवारी भेट देणार 

मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या पुतळा कोसळल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोषी सुटता कामा नये. घटनास्थळी जाण्यासाठी आम्ही शनिवारी (दि. ३१) निघणार आहोत. १ सप्टेंबर रोजी तिथे सकाळी भेट देणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT