वडिगोद्री : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेऊन उपोषण सोडण्याची विनंती केली. मात्र जोपर्यंत सरकार सर्व मागण्या पूर्ण करत नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याची भूमिका जरांगे यांनी घेतली आहे.
दरम्यान, जरांगे यांनी शुक्रवार (दि.४) पासून उपचार घेणे बंद केले असून सलाईन तसेच तपासणीदेखील करण्यास त्यांनी नकार दिला आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत काही घेणार नाही. सरकारने मागण्याची अंमलबजावणी केल्यावरच उपचार घेणार, असा पवित्रा जरांगे यांनी घेतला आहे. दरम्यान जरांगे यांच्या उपोषणाचा शनिवारी (दि.५) आठवा दिवस आहे. जरांगे यांच्या या निर्णयानंतर अंतरवालीत येणाऱ्या मराठा समाजबांधवांची गर्दी वाढत आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे २९ ऑगस्टपासून अंतरवाली येथे उपोषणाला बसले आहेत. या दरम्यान राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेऊन आरक्षणासंदर्भात ज्या काही मागण्या आहेत. त्या सोडवण्यासाठी वेळ मागितला होता. तसेच काही विषयावर मुख्यमंत्र्यांशी बोलतो असा शब्द दिला हेता. शिष्टमंडळाच्या विनंतीला मान देऊन जरांगे यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास होकार दिला होता. परंतु शुक्रवारपासून जरांगे यांनी पुन्हा वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला आहे.
जरांगे यांच्या म्हणण्यानुसार सरकार ५८ लाख नोंदी सुरू करतो म्हणाले. पण अजून त्याचं काम सुरू झालेलं नाही. हैदराबाद गॅझेटचं काम सुरू केलं नाही. गावात दवंड्या पिटतो म्हणाले की, तेही केलं नाही. हैदराबाद गॅझेटनुसार व्हॅलिडिटी द्यायची असली तर २०१२ च्या जातपडताळणी कायद्यात हैदराबाद, सातारा आणि कोल्हापूर गॅझेटचा समाविष्ट करण्यासाठी मुख्यमंत्री यांना बोलतो, असा शिष्टमंडळाने शब्द दिला होता. मात्र अद्याप शिष्टमंडळ का बोलले नाही? हैदराबाद गॅझेटच्या व्हॅलिडिटीचा प्रश्न मिटेल, असे जरांगे पाटील म्हणाले. दरम्यान, शनिवारी सकाळी डॉक्टरांचे पथक उपोषणस्थळी दाखल झाले असताना जरांगे यांनी तपासणी करून घ्यायला नकार दिल्याचे पहायला मिळाले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी माझ्या नादी लागू नये
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी माझ्या नादी लागू नये, महागात पडेल. महाराष्ट्र काडी लावून सोडून जाऊ नका, असा थेट इशारा मराठा आंदोलनाचे नेते उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.
मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा शनिवारी (दि.५) आठवा दिवस होता. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मराठ्यांना मुंबईत येण्यापासून रोखण्याच्या भानगडीत सरकारने पडू नये. शासनाकडून फक्त जीआर आणि कागद काढले जातात, पण जमिनीवर कोणतीही कामे होत नाहीत.
ज्या मराठा बांधवांना प्रमाणपत्रे दिली, ती आता रद्द केली जात आहेत आणि रद्द झाल्यावर कोर्टात किंवा आयुक्तांकडे जा असे सांगितले जात आहे. आम्ही सरकारला विचारतोय की, ही प्रमाणपत्रे रद्द का केली? तहसीलदार म्हणतात वरून आदेशच आले नाहीत. ही निव्वळ मराठा समाजाची फसवणूक आहे. महाविकास आघाडीने काही केले नाही म्हणून जनतेने महायुतीला सत्तेवर आणले; मात्र तुम्ही दिलेली प्रमाणपत्रे रद्द करून समाजाचे वाटोळे करत असल्याचा आरोप यावेळी जरांगे यांनी केला.
सरकारमध्येच आपसांत मतभेद
भाजप आणि शिंदेसेनेतील अंतर्गत समन्वयावर बोट ठेवत जरांगे म्हणाले की,या सरकारमध्ये मोठे मतभेद आहेत. याला वाटते त्याचे नाव नको व्हायला, त्याला वाटते याचे नाव नको व्हायला. शिंदेसेना आणि भाजप या दोन्ही सत्ताधारी पक्षांमधील श्रेयवादात हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट आणि संपूर्ण मराठा आरक्षण अडकवून ठेवले आहे." एकाच कुटुंबात चुलत्याचे कुणबी प्रमाणपत्र निघते पण पुतण्याचे निघत नाही, अशा शेकडो त्रुटींचा पाढा वाचत त्यांनी उपसमितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
मुख्यमंत्र्यांना मराठा सेवकाचे रक्ताने पत्र
अंबड तालुक्यातील महाकाळा येथील मराठा सेवक भरत बापूराव आंबरुळे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वतःच्या रक्ताने ५ सप्टेंबर रोजी पत्र लिहून आपला रोष आणि वेदना मांडल्या आहेत.जय जिजाऊ, जय शिवराय' असा उल्लेख करत भरत आंबरुळे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या या पत्रात मराठा समाजाच्या मागण्यांचा पुर्नउच्चार केला आहे.