Manoj Jarange Patil Maratha Reservation
पाच दिवसांनंतर मनोज जरांगे पाटील यांनी आज बुधवारी त्यांचे उपोषण स्थगित केले.  Pudhari photo
जालना

Manoj Jarange Patil Maratha Reservation| मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

पाच दिवसांनंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज बुधवारी त्यांचे उपोषण स्थगित केले. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) आंदोलनादरम्यान पोलिसांच्या लाठीहल्ल्यात ज्या महिला जखमी झाल्या होत्या त्यांच्या हातून फळांचा रस पिऊन तसेच आंतरवाली सराटीतील ग्रामस्थांच्या हातून पाणी पिऊन जरागेंनी उपोषण सोडले. दरम्यान, दोन दिवसांनंतर राज्याचा दौरा करणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांनी डॉक्टरांकडून उपचारास नकार दिला होता. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत मराठा समाजाने चिंता व्यक्त केली होती. यामुळे आंतरवाली सराटीतील ग्रामस्थांनी त्यांना उपोषण थांबवण्याची विनंती केली होती. त्यानुसार जरांगेंनी आज उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे आणि सगेसोयऱ्यांचा अध्यादेश तातडीने लागू करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी २० जुलै रोजी उपोषण सुरु केले होते. आता उपोषण सोडून समाजामध्ये जाणार असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. आंतरवाली सराटीतील ग्रामस्थांच्या आग्रहानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

३० ते ४० आमदार निवडून आणणार- जरांगे पाटील

समाजाच्या विनंतीनंतर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे -पाटील यांनी आपले उपोषण आज स्थगित केले. समाज मागणी करू लागल्याने सलाईन लावून घेतले. परंतु, सलाईन लावून उपोषण करण्यात काहीही अर्थ नाही, असे सांगून विधानसभेला ३० ते ४० आमदार निवडून आणणार असल्याचा निर्धार जरांगे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

राज्य सरकारला १३ ऑगस्टपर्यंत अल्टिमेटम

आमचे प्रश्न मांडण्यासाठी विधानसभेत कुणीही नाही. त्यामुळे विधानसभेत आपले ३० ते ४० आमदार पाठवणार असल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांनी सगेसोयऱ्याच्या अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारला १३ ऑगस्टपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. आता उपोषण सोडून नागरिकांमध्ये जाणार आहे. मराठा आरक्षण मिळाल्यावर पहिला गुलाल अंतरवाली सराटीत उडवणार आहे. गाव, समाज सोडून मी कुठेही जाणार नाही. उपोषण हीच माझी खरी ताकद आहे, असे ठामपणे सांगितले.

जरागेंच्या काय आहेत मागण्या?

जात वैधता प्रमाणपत्राची मुदत वाढ देत असताना एसईबीसी, कुणबी आणि ईडब्ल्यूएस हे तीनही ऑप्शन खुले ठेवा. ज्या मराठ्यांची नोंद सापडली, त्या मराठ्यांना म्हणजे मागील त्या मराठ्यांना प्रमाणपत्र द्यायचं, हे मार्गी लावा. हैदराबाद गॅझेट, बॉम्बे गॅझेट व सातारा संस्थान ही तिन्ही गॅझेट लवकरात लवकर लागू करा, अशी मागण्या त्यांनी केल्या आहे.

SCROLL FOR NEXT