वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : माझ्या समाजासाठी मी उपोषण करत आहे. माझ्या शरीराला काय त्रास होत आहे, याची जाणीव मराठ्यांच्या नेत्याला नाही. ते नेत्याची बाजू घेता घेता समाजाच्या विरोधात बोलत आहेत. प्रवीण दरेकर आणि छगन भुजबळ यांचे रक्त एक झाले की काय ? कारण छगन भुजबळ यांची सुद्धा भाषा तशीच होती. फक्त माझे उपोषण संपू द्या, मी सगळ्यांचा हिशोब घेतो, असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला. आज (दि.२३) त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. ते पत्रकारांशी संवाद साधत होते. (Manoj Jarang)
ते पुढे म्हणाले की, दरेकरांना हेच माहित नाही की उपोषण केल्याने काय हाल होतात आणि आरक्षण नसल्यामुळे काय आमच्या समाजाचे हाल होतात. परत एकदा सांगतो उपोषण संपू द्या, ते जे जे काही बोलले, त्या सगळ्यांचा हिशोब घेणार. (Manoj Jarang)
राज्य शासनाने काल वैद्यकीय अभियांत्रिकी व इतर प्रवेशासाठी एसईबीसी जात वैधता प्रमाणपत्रासाठी सहा महिन्यांची मुदत वाढवून दिली. यावर बोलताना जरांगे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला, त्याबद्दल त्यांचे खरंच कौतुक करतो. मी इथून मागे सुद्धा सांगत होतो की, मराठ्यांना आरक्षण देऊ शकतात. ते फक्त एकनाथ शिंदे साहेबच. म्हणून सांगतो आरक्षण लवकर द्या, पण तुम्ही उशीर करू नका. समाजाच्या हाल अपेष्ट झाल्यानंतर देऊ नका. (Manoj Jarang)
जात वैधता प्रमाणपत्राची मुदत वाढ देत असताना एसईबीसी, कुणबी आणि ईडब्ल्यूएस हे तीनही ऑप्शन खुले ठेवा. म्हणजे मराठ्यांची मुलं मागे राहणार नाहीत. ज्या मराठ्यांची नोंद सापडली, त्या मराठ्यांना म्हणजे मागील त्या मराठ्यांना प्रमाणपत्र द्यायचं, हे मार्गी लावा. हैदराबाद गॅझेट, बॉम्बे गॅझेट व सातारा संस्थान ही तिन्ही गॅझेट लवकरात लवकर लागू करा. कारण आमचे पूर्ण मराठे संपल्यावर तुम्ही देणार असाल. तर त्याचा काही फायदा होणार नाही. शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली मात्र, त्यांच्या भेटीदरम्यान काय झाले, हे मला सांगता येणार नाही. नेमकी त्यांची भेट कशासाठी झाली, हेच मला माहित नाही. आरक्षणासाठी जर झाली असती, तर बातमी बाहेर आली असती. (Manoj Jarang)
सरकारचे कोणी प्रतिनिधी आले नाही, तरी मला काही वाटत नाही आणि आम्ही त्यांना बोलवतही नसतो. सरकारचे प्रतिनिधी नाही आले तर नाही आले मात्र आमचं काम हेच आहे की मराठ्यांसाठी लढणं. सर्वपक्षीय बैठकीवर बोलताना मग घेतील ना बैठक आमच्या त्याच्यावरती काहीच शंका नाही. पण मराठा आणि कुणबी एकच आहे. हे सिद्ध करायला एवढे दिवस लागत नाही. एका ओळीचा शासन निर्णय करायला एवढा वेळ लागत असतो का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.