वडीगोद्री: पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात काढणार आहे. दि. ७ ऑगस्टपासून सोलापुरातून ही रॅली निघून समारोप १३ ऑगस्टला नाशिकमध्ये होईल. तरी आपापल्या जिल्ह्यातील मराठा बांधवांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करा आणि रॅलीसाठी बैठक घेऊन नियोजन करा, अशा सुचना मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आज (दि.१८) दिल्या.
ते पुढे म्हणाले की, २० जुलैरोजी मी आमरण उपोषण सुरू करणार आहे. समाज म्हणतो तसा मी ऐकतो, वागतो पण उपोषण करण्यासाठी त्यांचा विरोध असताना मी समाजाचे ऐकत नाही, कारण त्यांचा त्रास दूर व्हावा, असे मला वाटते. जर सरकारने माझे आमरण उपोषण सोडवले नाही. तर रूग्णवाहिकेमध्ये जाऊन रॅलीत सहभागी होईल. २८८ आमदार उभे करायचे की पाडायचे, ते समाजाची बैठक घेऊन ठरवू, असेही जरांगे म्हणाले.
पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील मराठा बांधवांची बैठक घेतली आहे. तिकडे शांतता रॅली आम्हाला काढायची आहे. हा रॅलीचा दुसरा टप्पा असेल. शांतता रॅलीसाठी सर्वांनी एक दिवस काम बंद ठेवा आणि आपल्या लेकरांसाठी एक दिवस वेळ द्या. रुसवे, फुगवे सोडून द्या, जातीसाठी ताकदीने एकत्र या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आमदार प्रसाद लाड यांनी आमच्यामध्ये ढवळाढवळ करू नये. मराठ्यांची आस्था असेल, तर त्यांनी बोलावे. देवेंद्र फडणवीस यांनी आमदारकी दिली म्हणून त्यांची बाजू घेऊन त्यांनी बोलू नये, असा टोला जरांगे यांनी लगावला. आमदार प्रवीण दरेकर तुम्ही आरोप करायचा म्हणून करू नका, अंतरवालीत या समोरा समोर बसू, तुम्हाला सन्मानाने वागवू, मी चुकलो असेल, तर मला सांगा. फडणवीस चुकले असतील तर तसे सांगावं लागेल, असे जरांगे म्हणाले.