जालना : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतील ज्या लाभार्थी महिलांच्या ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक चुका झाल्या आहेत, अशा महिलांसाठी सुधारणा करण्याची संधी 31 मार्च पर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जालना जिल्ह्यातील 4 लाख 72 हजार महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे. या योजनेतील अर्जातील त्रुटीची सुधारणा करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, आर. व्ही. कड यांनी केले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना किंवा ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना अनेक महिलांनी कुटुंबातील सदस्यांच्या नोकरीविषयक माहितीमध्ये नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडला आहे. अशा लाडक्या बहिणींना तांत्रिक चुक दुरूस्त करण्याची संधी पुन्हा एकदा उपलब्ध करुन देण्यात आली.
पर्यायांची निवड करताना झाली चूक
विशेषतः कुटुंबातील सदस्य सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ किंवा स्थानिक संस्थेत नियमित/कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत किंवा कसे? तसेच कुटुंबातील सदस्य सेवानिवृत्ती वेतन घेत आहेत किंवा कसे? या पर्यायांची निवड करताना झालेल्या चुकांमुळे पात्र महिलांना लाभ मिळण्यास तांत्रिक अडचणी येत आहेत.
ई-केवासी बाकी असलेल्या लाभार्थी
जालना - 12444
बदनापूर - 3592
अंबड - 5958
भोकरदन - 6349
घनसावंगी - 4869
जाफराबाद - 3180
मंठा - 3798
परतूर - 3635
एकूण - 43822